पुणे-मुंबई मार्गावरील हजारो नोकरदारांना रोजचा जाच
पुणे – पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची “लाइफलाइन’ असणाऱ्या “एक्स्प्रेस’ला वारंवार उशीर होत असल्याने प्रवाशांकडून तीव्र शब्दांत संताप व्यक्त होत येत आहे.
दररोज हजारो नागरिक पुणे ते मुंबई मार्गावर प्रवास करतात. पुणे-मुंबई मार्गावरील धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सह्याद्री एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आदी गाड्यांमुळे नागरिकांना प्रवास करणे सोपे जाते. सध्या मात्र नागरिकांना हा प्रवास सोयीस्कर ठरण्याऐवजी त्रासदायक ठरत आहे. एक्स्प्रेसला होणारा उशीर हे यामागील कारण आहे.
सुमारे 80 टक्क्यांपेक्षा जास्त गाड्या वेळापत्रकानुसार अचूक धावत असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत आहे. परंतु, दुसरीकडे पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना दररोज सुमारे 30 ते 40 मिनिटे उशीर होत असल्याचे वास्तव आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियमाप्रमाणे सुपरफास्ट आणि एक्स्प्रेस गाड्यांना धावण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र या मार्गावर “लोकल’ साठी या गाड्या थांबवण्यात येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना एक्स्प्रेस नियोजित वेळेमध्ये मुंबईमध्ये पोहोचणे अपेक्षित असते. मात्र लोणावळा स्थानकानंतर अनेकदा गाड्या थांबवून अन्य गाड्यांना प्राधान्य देण्यात येते. परिणामी, चाकरमान्यांना मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी उशीर होतो. दररोज किमान 40 मिनिटे एक्स्प्रेस उशीर पोहोचत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नोकरदार प्रवासी वेठीस
एक्स्प्रेस गाड्यांना सिग्नल देण्यात येत नसल्याने वेळापत्रक कोलमडते. मुंबईकरांना मदत मिळण्याचा दृष्टीकोनातून हे निर्णय घेण्यात येत आहेत. याचा मुंबईतील प्रवाशांना फायदा होत असला, तरी अन्य शहरांतील नोकरदार प्रवाशांना वेठीस धरण्यात येत आहे. या वेळापत्रकाचा सर्वांत जास्त फटका नोकरदार प्रवाशांना प्रवाशांना बसत आहे, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.