कबीर बोबडे
नगर – नगर जिल्ह्यात असलेल्या आरोग्य केंद्रांची संख्या पाहता जिल्ह्याचे आरोग्य रामभरोसे असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाखाच्या पुढे गेली असतांनाही अजूनही 99 प्राथमिक व 555 उपक्रेंद व 23 ग्रामीण रुग्णालये अस्तित्वात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आजही रुग्णांना उपचारांसाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तसेच आरोग्य केंद्र कमी तर आहेत पण वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना तत्काळ सेवा मिळणे अवघड झाले आहे. परिणामी खासगी डॉक्टरांचा व्यवसाय तेजी असल्याचे चित्र आहे.
नव्याने लोकसंख्येच्या निकर्षानुसार नगर जिल्ह्यासाठी 15 प्राथमिक तर 100 उपक्रेंद्रांची आवश्यकता आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा प्रस्ताव शासनस्तरावर धुळखात पडलेला आहे. याबाबत कोणीही पाठपुरावा फारसा केला नाही. मध्यतंरी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे व उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला.जिल्ह्यात 1 हजार 588 गावे असून 1 हजार 311 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये नगर तालुक्यात 127 गावे, पारनेरमध्ये 131, श्रीगोंदा 93, श्रीरामपूर 54, शेवगाव 112, राहुरी 96, राहता 60, पाथर्डी 132, कर्जत 118, नेवासा 120, संगमनेर 171, कोपरगाव 79, जामखेड 88 आणि अकोले तालुक्यात 191 गावे आहेत.
सर्वसाधारणपणे 30 हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात 20 हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी व त्याच्या सहाय्यासाठी 14 निमवैद्यकीय व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे 24 तास सेवा देते. सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाख असून या नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात केवळ 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 555 उपकेंद्र आहेत. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी इतकीशी सुविधा पुरवणारी आरोग्य केंद्र पुरेशी नसल्याची चिंताजनक बाब यातून स्पष्ट होते. या एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी 9 प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र असून उर्वरित 87 प्राथमिक आरोग्य केंद्र बिगर आदिवासी आहेत. तर जिल्ह्यात एकूण आरोग्य उपकेंद्रांचीपैकी 48 उपकेंद्र आदिवासी तर 507 बिगर आदिवासी उपकेंद्र आहेत.
जिल्ह्यात आरोग्य विभागांतर्गत जिल्हा मुख्यालयी जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. कर्जत आणि पाथर्डी या तालुक्याची 2 उपजिल्हा रुग्णालये आहेत. जिल्ह्यात एकूण 23 ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्ह्यातील महत्वाच्या मोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यानंतर ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. अशा महत्वाच्या गावामध्ये आरोग्य उपकेंद्र निर्माण केले आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात 5 ते 6 उपकेंद्र असतात. या उपकेंद्रामध्ये आरोग्यसेवक (पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर अशा 3 अशी लोक काम करतात. उपकेंद्रात प्रथमोपचार, प्रसुतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता बालसंगोपन विषयक सल्ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्ठरोग व हिवतापाच्या रुग्णांना उपचार, आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरविण्यात जातात.
या ठिकाणी नियुक्ती केलेली आरोग्यसेवकाच्या माध्यमातून गावातील तसेच उपकेंद्राशी जोडलेल्या गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवल्या जाते.मात्र, जिल्ह्यात आरोग्यसेवकांची 300 पदे अद्याप रिक्त असल्याची माहिती, आरोग्य विभागातून देण्यात आली.
आरोग्य केंद्राची कामे
स्थानिक उद्भवणाऱ्या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोगशाळेच्या सेवा पुरवणे, उपकेंद्रांच्या मदतीने रोगांचा प्रतिबंध, आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य कार्य आहे. शिवाय, हिवताप, हत्तीरोग, टी.बी. कुष्ठरोग, अंधत्व, लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे नियंत्रण करणे, लसीकरण मोहीम राबवणे, गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे, सांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व उपचार करणे हे कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडते.