पावसाची उच्चांकी नोंद; नियमांचा बागुलबुवा न दाखविता सरसकट भरपाईची मागणी
सरसकट पंचनाम्याचे काम गतीने सुरू
खंडाळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कृषी, महसूल आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाकडून सुट्टीच्या दिवशीही सरसकट पंचनाम्याचे काम गतीने सुरू आहे. दोन दिवसांच्या अंतिम अहवालानंतर नुकसानीचा निश्चित आकडा समोर येणार आहे. शेती पिकासह काढून ठेवलेल्या पिकांचेही पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत, असे खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी सांगितले.
शिरवळ – खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांची जागेवर उगवण, तर काही पिके पूर्णपणे पाण्यात कुजून गेल्याने नियमांचा बागुलबुवा न दाखविता सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
खंडाळा तालुक्यात गतवर्षी 352 मिलिमीटर पाऊस झाला होता. यामध्ये खंडाळा मंडलात 389 मिलिमीटर, वाठार बद्रुकु 234 मिलिमीटर, शिरवळ 546 मिलिमीटर तर लोणंद मंडलात 241 मिलिमीटर पाऊस झाला होता. परंतु यावर्षी तालुक्यात पावसाची उच्चांकी अशी नोंद झाली आहे. संपुर्ण तालुक्यात एकूण 935 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून खंडाळा मंडलात 997 मिलिमीटर, वाठार बद्रुक 653 मिलिमीटर, शिरवळ 1301 मिलिमीटर, लोणंद 789 मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे. जून ते जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण होते. परंतु, तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या भाटघर, वडवाडी, विंग, पळशी, जवळे, नायगाव, घाडगेवाडी, लोहोम, कर्नवडी, कान्हवडी, लिंबाचीवाडी, जवळे, कवठे या भागात ऑगस्टमधील पावसातच मोठे नुकसान झाले होते.
यानंतर सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील धनगरवाडी, पानसरेवस्ती, शिवाजीनगर, अंदोरी, अहिरे, मोर्वे, निंबोडी, पाडळी, बोरी, सुखेड, कोपर्डे या भागांतील शेती पाण्याखाली गेली असून परिसरातील ओढे तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. तालुक्याच्या सर्वच भागांतील शेतामध्ये पाणी घुसल्याने शेतपिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सध्या बाजरी पिकाची काढणी सुरू असल्याने सर्व पिके कणसासहित पाण्यात बुडाली आहेत. ऊस, भुईमूग, टोमॅटो, सोयाबीन तसेच कडधान्यांची पिके व काही फळबागा पाण्यामुळे बाधित झाल्या आहेत.
या पिकांची तालुका कृषी अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाकडून नुकसान पाहणी सुरू केली असून पंचनामे करण्याचे काम गतीने सुरु आहे. खंडाळा तालुक्याच्या एकूण क्षेत्रापैकी खरीप हंगामात भात 600 हेक्टर, बाजरी 7627 हेक्टर, मका 22 हेक्टर, मूग 210 हेक्टर, तूर 11 हेक्टर, उडीद 70 हेक्टर, घेवडा 75 हेक्टर, वाटाणा 52 हेक्टर, पावटा 10 हेक्टर, भूईमूग 335 हेक्टर, सोयाबीन 270 हेक्टर, ऊस 205 हेक्टर यांसह अन्य कडधान्य, गळीतधान्य इत्यादी पिकांची लागवड झाली होती.
यापैकी बहुतांशी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या 62 गावांमध्ये सुमारे 5489 शेतकऱ्यांचे 1870 हेक्टर क्षेत्र ऑगस्टच्या पाहणीतच बाधित झाले होते. परतीच्या पावसाने अद्यापपर्यंत आणखी 308 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आले असून पुढील दोन दिवसांत अंतिम नुकसान अहवाल स्पष्ट होणार आहे. तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीने सर्वच मार्गाची अवस्थाही दयनीय झाली असून अनेक गावांना जोडणारे लहान- मोठे पूलही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. याचबरोबर पाझर तलाव तसेच बंधाऱ्यामधून होणाऱ्या गळतीने ग्रामस्थांना जीव मुठीत घेउन राहवे लागत आहे. त्यामुळे झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांना तारक न राहता मारक अशीच राहिली आहे.