राजगुरूनगर – खेड तालुक्यात जुलै ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये खरीप हंगामातील वाचलेली पिके आता परतीच्या पावसाच्या कचाट्यात सापडली आहेत. अद्यापही तालुक्यात दिवसागणिक अतिवृष्टी होत असल्याने हाताशी आलेली पिके वाया जात आहेत. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार 84 गावांतील 1 हजार 438 हेक्टर क्षेत्र बाधीत होऊन 2619 शेतकरी पिकबाधीत होते. प्रत्यक्ष महसूल, ग्रामसेवक, आणि कृषी विभागाचे कर्मचारी या तीन यत्रंणामिळून संयुक्त पीक पंचनामे करण्यात रविवार (दि. 3) पासून सुरुवात झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी दिली.
खेड तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी विभागाचे कर्मचारी अशा तीन यत्रंणा संयुक्तिक पंचनामे करण्याचे आदेश प्रांत सजंय तेली यांनी दिले आहेत. तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील हाताशी आलेल्या नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. तर शासनाच्यावतीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे आदी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार सुचित्रा आमले यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आलेल्या शासनाच्या प्रतिनिधींना सहकार्य करावे असे आवाहन प्रांत संजय तेली,तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.
आचारसंहितेत अडकली नुकसानभरपाई –
अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. शासनाने पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्याने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामसेवक कर्मचाऱ्यांना मात्र चागंलीच कसरत करावी लागली होती. 178 गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधीत पिकांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला; परंतु निवडणुकीच्या आचारसंहितेत नुकसान भरपाई अडकल्याने शेतकरी आता नवीन सरकार कधी सत्तेवर येते याची वाट पहात आहे.
1512.36 हेक्टरचे नुकसान –
जुलै ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त बाधीत पिकांचे पंचनामे 4544 शेतकऱ्यांचे जिरायती क्षेत्रातील 1512.36 हेक्टरचे नुकसान झाल्याचे समोर आले. पैकी भात 256.45 ,भाजीपाला 241.7, भुईमूग 61.12, बटाटा 354.3,सोयाबीन 142.9,इतर 456.2 असे पिकांचे नुकसान झाले. बागायती क्षेत्रातील बाधीत पिकाखालील 1949 शेतकऱ्यांचे 649.44 हेक्टरमधील मका, टोमॅटो, सोयाबीन,भाजीपाला, बटाटा पिकांचे नुकसान झाले. तर फळपिकांचे 4 शेतकऱ्यांचे 2.70 हेक्टरचे क्षेत्र बाधीत झाले होते.
पाच महिन्यांत तब्बल 1293 मि.मी. पाऊस –
जुलै ऑगस्टमधील झालेल्या अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या 6497 शेतकऱ्यांचे 2164.80 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसानीला तोंड द्यावे लागत असताना परतीच्या पावसाने चागंलाच धुमाकूळ घातला आहे. खेड तालुक्यात गेल्या तीन वर्षांतील पावसाची पर्जन्यमान नोंदीचा सरासरी आढावा पहाता यंदा जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत 1293 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. 2017-18 मध्ये. 1043.2 तर 2018-19 मध्ये 619 मि.मी. सरासरी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची वस्तूस्थिती व पंचनामा अहवाल शासनाकडे तत्काळ पाठविण्यात येणार आहे. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांच्या सर्वेक्षणानुसार तालुक्यात 1 हजार 134 हेक्टर भात पिकाचे व 334 हेक्टर क्षेत्रात भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याचा नजर अंदाज आहे.
– बाळासाहेब मांदळे, कृषी अधिकारी, खेड तालुका