संगमनेर – निळवंडे कालव्याला मागच्या दिवाळी पाडव्यालाच पाणी येणार होते. आपण त्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण सध्या कोणी तरी पाहुणा येणार म्हणून निळवंडेच्या पाण्याला उशीर करू लागले आहेत, असा टोला आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री विखे यांना नाव न घेता लगावला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते.
पत्रकारांशी संवाद साधताना आ. थोरात म्हणाले की, धर्म ज्याचा त्याचा आहे. परंतु राजकारण आणि धर्म याच्यात मिसळ केली, तर देशाची प्रगती खुंटते. देश हा राज्यघटनेप्रमाणे चालतो. दुर्दैवाने देशात चाललंय ते सर्वोच्च न्यायालयाला पसंद पडत नाही. येत्या 5 तारखेला शिंदे गटाचे आमदार अयोध्येला जाणार असून, दुसरीकडे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. याबद्दल बोलताना आ. थोरात सांगितले की, कुटुंब अडचणीत ठेवून देव-देव करत बसणं हे असं होऊ शकतं.
अजूनपर्यंत कांद्याला जी मदत घोषित करण्यात आली आहे ती मिळाली नाही. नाफेडने खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ती मदत मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनपर्यंत काय मदत मिळणार हेसुद्धा जाहीर केलेले नाही.अधिवेशनात आम्ही प्रश्न उपस्थित केले तेव्हा सकारात्मक उत्तरे देऊन वेळ मारून नेली की काय असा प्रश्न पडला आहे.
काल रात्री छत्रपती संभाजीनगर येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, येत्या 2 एप्रिलला तेथे महाविकास आघाडीची मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकार व पोलीस यंत्रणेची जबाबदारी शांतता, सुव्यवस्था ठेवण्याची आहे. सभा घेणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. महाविकास आघाडीची सभा होणारच असल्याचेही आ. थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.