चंद्रकांत पाटील; कोरेगावात स्वाभिमानी विचार मंचचे कार्यकर्ते भाजपमध्ये
कोरेगाव – “राज्यामध्ये भाजप प्रवेश करण्याची लाट आली आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्टवादीच्या नेत्यांच्या झोपा उडाल्या आहेत. मोदींच्या केंद्र शासनाने 370 कलम हटवून काश्मिरचा प्रश्न सोडविला. मराठा समाजाला आरक्षण देवून राज्यात फडणवीस सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडविला. शेतीचे, विजेचे, उद्योगाचे, रोजगाराचे, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या पाच महिन्यांतच मार्गी लावले. त्यामुळे भाजपच्या शासनाबद्दल लोकांना विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे राष्टवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांबरोबरच हजारोंच्या संख्येने कार्यकर्तेही राज्यासह सातारा जिल्हयातून भाजपमध्ये सामील होऊ लागले आहेत,” असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोरेगांय येथील जाहीर कार्यक्रमात केला.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यपध्दतीच्या विरोधात शरद पवार यांचे कट्टर समर्थक सुनील खत्री यांच्या नेतृत्वाखाली कोरेगांव तालुक्यातील राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी विचार मंचची स्थापना करून दोन वर्षांपासून जाहीर बंड केले होते. चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, नरेंद्र पाटील, माजी आमदार मदन भोसले, युवा नेते महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनील खत्री यांच्या नेतृत्वाखाली राष्टवादीच्या दोन हजार प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
सातारा जिल्ह्यासह कोरेगांव व खटाव तालुक्यातील दुष्काळी भागांना शेतीचे पाणी मिळावे, म्हणून वरदायिनी ठरणाऱ्या जिहे कठापूर, उरमोडी, वसना- वांगना पाणी योजनांना भाजप शासनाने संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला. रोजगार, आरोग्य, उद्योग, पाणी यासह इतर सुविधा देण्याची भूमिका घेतल्यानेच राज्यात भाजपबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने नेते आणि त्यांचे कार्यकर्ते भाजपत प्रवेश करीत आहेत. कोरेगांव तालुक्यातील निष्क्रिय आमदाराविरोधात बंड करणाऱ्या स्वाभिमानी विचार मंचच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये सन्मान केला जाईल. त्यांच्या सर्व विकास कामांच्या योजना पूर्ण केल्या जातील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.
कार्यकर्त्यांची कदर करणारे चंद्रकांत पाटील यांना कार्यकर्त्यांची चांगलीच जाण आहे. त्यामुळे स्वाभिमानी विचार मंचच्या विकासाच्या सर्व संकल्पना त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागतील, असा विश्वास किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांनी व्यक्त केला. आमदार शशिकांत शिंदे यांनी तालुक्यात शैक्षणिक संकुले, विस्तारीत एमआयडीसी, शेतीचे पाणी, कारखानदारी यासारखे प्रश्न मार्गी न लावल्याने आणि गावांगावांत गटबाजी व जिरवाजिरवीचे राजकारण केल्याने त्यांना शह देण्यासाठी मंचाच्या दोन हजार कार्यकर्त्यांनी भाजपत प्रेवश केला, असे सुनील खत्री यांनी यावेळी सांगितले. महेश शिंदे, ऍड. नितीन भोसले यांची यावेळी भाषणे झाली.