उत्पादन घटल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच आवक : दर्जाही घटला
पुणे – दुष्काळ, पाणीटंचाईचा फटका यंदा पुरंदर, पारनेर भागातील मटारला बसला आहे. उत्पादन घटल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्केट यार्डातील तरकारी विभागात निम्मीच आवक होत आहे. मागील वर्षी हंगामाच्या सुरूवातीला 15 ते 16 गाड्या आवक होत होती. ती यावर्षी पहिल्या दोन दिवसांत मिळून 7 ते 8 गाड्या झाली आहे. बाजारात दाखल होणाऱ्या मालापैकी केवळ 30 टक्के माल दर्जेदार आहे. त्यास चांगला भाव मिळत असल्याचे व्यापारी आणि आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
बाजारात रविवारपासून (दि. 11) मटारची आवक सुरू झाली आहे. रविवारी पाच ते सहा गाड्या आणि सोमवारी दोन गाड्या आवक झाली आहे. सप्टेंबरपर्यंत या मटारचा हंगाम सुरू राहणार असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले, यावर्षी नेहमीच्या तुलनेत कमीच आवक होणार आहे. मात्र, येत्या दिवसात आवक काही प्रमाणात वाढेल. चवीला गोड असल्याने पुरंदर, पारनेर मटारची नागरिक दरवर्षी वाट पाहतात. सध्या घाऊक बाजारात या मटारला दर्जानुसार प्रती किलोस 50 ते 70 रुपये भाव मिळत आहे. दुसरीकडे कर्नाटकातून मटारची आवक सुरू आहे. रविवारी बेळगाव, धारवाड भागातून 2 गाड्यांची आवक झाली होती. त्यास किलोस दर्जानुसार 40 ते 50 रुपये भाव मिळत आहे. स्वस्तात असल्याने हॉटेल्सकडून या मटारला मागणी असते. तर गोडी, लांब आकार असल्याने घरगुती ग्राहकही पुरंदर, पारनेर मटारची मागणी करतात. पुराचा फटाका कर्नाटकातही बसला आहे. तेथून होणारी आवक काही दिवसातच बंद होणार असल्याची शक्यताही भुजबळ यांनी वर्तविली आहे.