जिल्हाभरात पाणीटंचाईची तीव्रता वाढली ः जलस्रोत आटल्याने अनेक योजना बंद
विकत पाणी मिळणेही झाले मुश्कील
सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सर्वत्रच बिकट होत चालला आहे. सध्या पाण्याची मागणी वाढली असल्याने पैसे देऊनही जारचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहेत. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून हे गळके व्हॉल्व्हच नागरिकांसाठी एकमेव पाणी मिळण्याचे स्रोत आहेत. मात्र हंडाभर पाण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे.
नगर – जिल्हा सध्या दुष्काळाच्या झळांनी चांगलाच भाजून निघत आहे. त्यातच धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने सर्वत्र पाणीटंचाईची भीषणता वाढत चालली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणी योजनांचे उद्भव कोरडे पडले असून, त्या गावांना प्रशासनाने टॅंकर सुरू केले आहेत. तसेच ज्या गावांच्या योजना सुरू आहेत, तेथेही आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी योजनांचे गळती लागलेले व्हॉल्व्हच नागरिकांना संजीवनी देत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे गावातील तळी, नालाबांध भरलीच पूर्ण क्षमतेने भरलीच नाहीत. जलयुक्त शिवार योजनेतून जरी जिल्ह्यात कामे झाली असली, तरी पाऊस अत्यल्प पावसामुळे त्याचा पाहिजे तसा जलपुनर्भरणासाठी उपयोग झाला नाही.
कमी पावसामुळे जिरायती क्षेत्रात खरीप व रब्बीची पिकेही शेतकऱ्यांना घेता आली नाहीत. तसेच ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पिके घेतली, त्यांनाही ती पाण्याअभावी जगविता आली नाहीत. त्यामुळे त्यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. ज्यांची पिके हाती लागली, त्यांना भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी ऐन दुष्काळात चांगलाच अडचणीत आला. पाऊस कमी झाल्याने डिसेंबर-जानेवारीच्या तोंडावरच अनेक गावांना पाणीटंचाईची चाहूल लागली होती. फेब्रुवारीपासूनच अनेक गावांतून टॅंकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे येऊ लागले होते. मार्च-एप्रिलला अनेक गावांच्या पाणी योजनांचे उद्भव कोरडे पडले. त्यामुळे या गावांनाही पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करावे लागले.
जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने छावण्यांची मागणी पशुपालकांकडून होऊ लागली होती. त्यामुळे शासनाने अनेक गावांत जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. त्यामुळे किमान जनावरे जगविने तरी शेतकऱ्यांना शक्य झाले. शहरांच्या पाणीयोजना धरणांवरून असल्याने अद्यापतरी तेथील नागरिकांना पाणी मिळत आहे. मात्र तेही आठ-दहा दिवसांतून एकदाच मिळत आहेत. अशाही परिस्थितीत या योजनांच्या जलवाहिन्यांवरील गळके व्हॉल्व्हच सध्या नागरिकांसाठी संजीवनी ठरत आहेत. अशा गळक्या व्हॉल्व्हवर दिवसभर पाणीभरण्यासाठी अबालवृद्धांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.