सातारा – दुष्काळामुळे पाणी टंचाईच्या झळा, उन्हाची काहिली अशा परिस्थितीत फळ बाजारात फळांची आवक मंदावल्याने दरांमध्ये 1 ते 15 टक्के वाढ झाली आहे. कलिंगड सारख्या पाणीदार फळांचा किरकोळ दर चाळीस रुपयांपर्यंत पोहचल्याने पवित्र रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांना फळ खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
रमजान महिना सुरू झाल्याने साताऱ्याच्या फळबाजारात केळी, आंबा, पपई, कलिंगड व खरबुजाची मागणी वाढली आहे. मात्र क्रॉफर्ड मार्केट मुंबई, मार्केट यार्ड पुणे, शिवाजी मार्केट कोल्हापूर व देवगड सिंधुदुर्ग येथून सफरचंद, केळी पेरू आंबा कलिंगड या फळांची आवक मंदावल्याने पाण्याअभावी दुष्काळझळा तीव्र झाल्याचे स्पष्ट आहे. साताऱ्यात रमझानच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची फळांच्या उपलब्धतेसाठी धावपळ सुरू आहे. आवक घटल्याने पेरू, चिक्कू, टरबूज या फळांचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे केळीला स्वस्त म्हणून पसंती दिली जात आहे. नाशिक आणि जळगाव येथून दीड हजार कॅरेटची साताऱ्यात आवक होते. मात्र, यंदा हे प्रमाण सहाशे कॅरेटवर आल्याने केळीचा दरही चढताच असून पिवळ्या धमक केळींनी बाजारपेठ सजली आहे. ग्राहकांना सेंद्रिय पध्दतीने पिकवलेली गावरान केळी मिळेनाशी झाली आहे.
पाणीटंचाई, वाहतुकीचे वाढते दर यामुळे बाजारात फळांचा तुटवडा जाणवत आहे. आवक निम्म्यावर आल्याने कलिंगड व टरबूज या फळांचे दर चढे राहिले आहेत. सोलापूर, आंध्र, गुजरात व महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून फळे विक्रीसाठी साताऱ्यात येत आहेत.
अयुब बागवान फळ विक्रेता, सातारा.