तीनशे ते चारशे रुपये द्यावी लागतेय मजुरी
चिंबळी – येथील परिसरातील विविध भागांमध्ये गेल्या चार महिन्यांपूर्वी रब्बी हंगामातील करण्यात आलेल्या कांदा पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, सध्या करोनामुळे शेतमजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे.
चिंबळी, कुरूळी (ता. खेड) परिसरातील केळगाव, निघोजे, माजगाव, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद, चऱ्होली, कोयाळी परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यापासून कांदा काढणी सुरू केली आहे. मात्र, या परिसरात औद्योगिक क्षेत्रामुळे शेतकरी मजुरांची टंचाई भासत आहे.
त्यातच आता गेल्या पधंरा दिवसांपासून करोना व्हायरस विषाणू संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाला असल्याने कांदा काढणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई निर्माण झाली असल्याने मजूर शोधण्यासाठी शेतकरी वर्गांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली आहे.
ठाकर समाजातील मजूर शोधून तीनशे ते चारशे रुपये मजुरी देऊन कांदा काढणी करावी लागत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यापासून कडक उष्णता निर्माण होत असल्याने जादा मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच कांदा काढणीसाठी
कौल दिला आहे.