वानवडी (पुणे) – महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी सध्या सुरू असलेला स्वबळावरचा नारा थेट गावच्या जत्रेतील नुरा कुस्तीची आठवण करून देणारा आहे. आजवर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष आघाडी करून एकत्र लढत आले. तेव्हा ही नुरा कुस्ती पहायला मिळाली आणि आता तिसरा शिसवेना पक्षही यात सहभागी होत आहे.
त्यामुळे या तीन पक्षाने एकत्र निवडणूक लढवली तर कोणत्याही दोन पक्षांत नुरा कुस्ती होणार आहे. तेव्हा काँग्रेसने स्वबळावर लढावे अशी अपेक्षा माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे व्यक्त केली.
काँग्रेस पक्षाने नेहमीच आघाडीचा धर्म पाळला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे हे खासदार आणि चेतन तुपे पाटील हे आमदार झाले. केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे हे शक्य होवू शकले. असा हल्लाबोल शिवरकर यांनी केला. मात्र आपल्यावेळी नेहमीच नुरा कुस्ती केली गेली, अशी खंतही शिवरकर यांनी व्यक्त केली.
वानवडीत कार्यकर्ता मेळाव्यात शिवरकर बोलत होते. काँग्रेसने प्रामाणिकपणे काम केल्याने स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवले, पाटलांच्या वेळेस तर सुरेश कलमाडी हे सहकारी व मित्र असतांनाही आम्ही त्यांना पाडले. पण कधी नुरा कुस्ती केली नाही. नेहमीच सच्ची कुस्ती केली. अशी कबुलीही शिवरकर यांनी यावेळी दिली.
नुरा कुस्तीमध्ये दोन्ही पैलवान ठरवूनच खेळतात. बराच वेळ खडाखडी चालते. या खडाखडीनंतर अनेकदा कुस्ती बरोबरीतच सोडविली जाते. कोणी जिंकत नाही आणि कोणी हरत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेमके निवडणुकीत असेच काहीसे सुरू असते.
आणि यावेळी तर शिवसेनाही सोबत आहे. त्यामुळे नुरा कुस्ती ही होणार हे निश्चितच आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुक स्वबळावर लढवावी. आपला उमेदवार पडला तरी चालेल, परंतु काँग्रेसचा पंजा घराघरात पोहचेल अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची मागणी आहे. असेही शिवरकर म्हणाले.
कॅन्टोन्मेंट व हडपसर विधानसभा मतदार संघात काँग्रेसने स्वबळावरच लढावे सत्तेत तीन पक्ष एकत्र असल्याने महापालिकेत तीन पक्षांचे उमेदवार एकत्र लढवणे अवघड आहे. या दोन्ही मतदार संघात आजवर कॉंग्रेसची ताकद अधिक राहिली आहे.
त्यामुळे आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी द्यावी, निवडून आणण्याची जबाबदारी, आम्ही घेतो अशी ग्वाही शिवरकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिली. तर आघाडीचा जो काही निर्णय आहे तो लवकर घेऊन कार्यकर्त्याला मोकळे करावे. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.