पवनानगर – मावळ तालुक्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका फूल शेतीला बसला आहे. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे फूलशेतीवर रोगाचे प्रमाणही वाढले आहे. सर्वच फूल शेतीवर या ढगाळ वातावरणामुळे फूल उत्पादनात फरक पडला.
मावळ तालुक्यात 250 हेक्टरपर्यंत फूल शेती आहे. सकाळी धुके, दिवसभर उन व दुपारनंतर पाऊस या सततच्या वातावरणातील बदलामुळे गुलाब शेतीवर डावणी (मोठ्या प्रमाणात पाने गळती होणे) व थ्रीप्स (लहान लहान पाखरे फुलातील पाकळ्यांमधील रस शोषन केल्यामुळे फुले खराब होतात) या किडीच्या प्रादुर्भावामुळे गुलाब शेतीच्या उत्पादनात 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर हवामानातील बदलामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.
याशिवाय बुरशी आल्यामुळे पानांची पूर्णपणे गळती होते. जरबेराच्या पानांवरती बुरशी रोगाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जरबेरा फूल उत्पादनात ही 40 टक्क्यांनी घट झालेली आहे, अशी माहिती जरबेरा फूल उत्पादक शेतकरी सोमनाथ ठाकर यांनी दिली आहे. सध्याच्या बदल्या हवामानाचा फटका भातपिकाबरोबरच पॉलीहाऊसमध्ये असणाऱ्या फूल शेतीला फटका बसला आहे, यामुळे फूल उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.