निवृत्त सैनिकाला जगावे लागत आहे हलाखीचे जीवन
पुणे -“डीएसके’ समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या शेकडो ज्येष्ठ नागरिकांना हाल-अपेष्टांमध्ये जीवन जगावे लागत आहे. मात्र, यातून लवकर मार्ग निघत नसल्यामुळे हे गुंतवणूकदार आता हताश होऊ लागले आहेत.
एका 58 वर्षीय माजी सैनिकाच्या कुटुंबालाही या खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या सैनिकाच्या पत्नीने सांगितले की, “20 वर्षे नौसेनेत सेवा केल्यानंतर मिळालेल्या पैशाची गुंतवणूक “डीएसकें’च्या कंपन्यांमध्ये केली होती. आता या गुंतवणुकीवर व्याज मिळत नसल्यामुळे त्यांच्या पतीला एका छोट्या कंपनीत सामान्य पदावर काम करावे लागत आहे.
दाम्पत्याला 19 वर्ष आणि 23 वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. माजी सैनिकाचे वयस्कर वडील त्यांच्यासोबतच राहतात. दाम्पत्याने “डीएसके’च्या कंपन्यामध्ये 14 लाख रुपये गुंतविले आहेत. “ही रक्कम आमच्या दृष्टीने फार मोठी आहे. मुलीचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चाला मदत व्हावी हा त्यामागे दृष्टिकोन होता. तर, आता मुलीसाठी आलेली 2 ते 3 स्थळे परत गेली आहेत,’ असेही सांगण्यात आले.
पीएमओशी पत्रव्यवहार
आता या गुंतवणूकदारांनी चैतन्य सेवाभावी संस्था नावाची संस्था स्थापन केलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून हे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक परत मिळवण्यासाठी अनेक आघाड्यांवर प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर त्यातील बऱ्याच गुंतवणूकदारांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र पाठविले असल्याचे या संस्थेचे सदस्य अध्यक्ष दीपक फडणीस सांगतात.
मुलींच्या लग्नाचा प्रश्न
“छोटी मुलगी हुशार असूनही शिक्षण घेऊ शकत नाही. मुलींच्या लग्नाचे काय होईल, त्यांच्या शिक्षणाचे काय होईल, या चिंतेने आम्हाला झोप लागत नाही, असे हे दाम्पत्य सांगते. त्यातच आता माजी सैनिकाच्या पत्नीला थायरॉइडचा त्रास सुरू झालेला आहे. दाम्पत्य कधीकधी आपल्या मुलीसमवेत “डीएसके’च्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांच्या बैठकीला उपस्थित राहते. आमचा प्रश्न शक्य तितक्या लवकर सुटण्याची गरज असल्याचे ते इतरांना सांगतात. व्याज आणि मुद्दल न परत मिळाल्यानंतर या दाम्पत्याने पोलिसाकडे रीतसर तक्रार केलेली आहे.