पुरंदर, शिरूरमधूनच उमेदवारी दिली जात असल्याचे कारण
मतदारसंघासाठी पक्षाची भूमिका महत्त्वाची
पुणे – गणेशोत्सवातच विधानसभा निवडणुकीचा श्रीगणेशा अनेक इच्छुकांनी केला आहे. जिल्ह्यातील दहा मतदार संघातून विविध पक्षांतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात असतानाच अनेकांकडून बंडखोरीचे ढोल वाजू लागले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील मंडळी यामध्ये आघाडीवर आहेत. यामुळे बंडखोरीचे हे वाजणारे ढोल बंद करण्याचे मोठे आव्हान या दोन्ही पक्षांपुढे आहे. पुरंदर-हवेली आणि शिरूर-हवेली मतदार संघामध्ये तर राष्ट्रवादीसाठी हा “ढोल’ मोठी डोकेदुखी ठरू शकतो. यामुळेच राष्ट्रवादीला हवेलीतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या “आवाजा’कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झालेली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पुरंदर-हवेली मतदार संघातून याकरिता किमान 4 जणांची नावे पक्षश्रेष्ठीकडे गेली आहेत. तर, शिरूर-हवेली मधून 6 जणांनी उमेदवारी मागितली आहे. यानुसार आता पुरंदरमधून जालिंधर कामठे आणि सदाशिवराव झेंडे यांची नावे आघाडीवर आहेत तर शिरूरमध्ये अशोक पवार, मंगलदास बांदल, प्रदिप कंद हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परंतु, आघाडीच्या निर्णयावरच उमेदवारीचा निर्णय अवलंबून आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस आगोदर या मतदार संघातील नावे जाहीर करण्याची प्रथा यावेळीही राष्ट्रवादी कायम ठेवणार अशीच चिन्हे आहेत. परंतु, उमेदवारी मिळण्यास उशीर होत असल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून नाराजीचा सूर आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने हवेली तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नेहमीच बोळवण केली आहे. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दूध संघ संचालक, जिल्हा बॅंक संचालक, तालुकाध्यक्ष, युवा अध्यक्ष अशी पदे बहाल करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढली गेली आहे. त्यातुलनेत पुरंदर आणि शिरूरमध्ये मोठी पदे दिली गेली आहेत. यामुळेच यावेळी आमदारकीची संधी हवेली तालुक्याला मिळावी, असा जोर कार्यकर्त्यांनी लावला आहे. हवेलीला यावेळी डावलले गेल्यास पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज होऊ शकतात तसेच अन्य पर्यायही अवलंबले जावू शकतात. यामुळेच हवेलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांभाळणे एकूणच बंडेखोरीचा ढोल शांत ठेवणे, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे आव्हान असणार आहे.
दरम्यान, पुरंदर आणि शिरूर तालुक्यातून उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला आव्हान असणार आहे. तालुका पातळीवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला शिवसेना तसेच अपक्ष उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये मत विभागणी होणार असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. हवेलीतून उमेदवारी दिली गेल्यास मतांची संख्या वाढू शकते. हवेलीतून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. शिवसेनेचा इच्छुक उमेदवार सोडला तर हवेलीतील पदाधिकाऱ्याला कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.