इंफाळ – भारत-म्यानमार सीमेलगत असणाऱ्या मणिपूरच्या मोरेह शहरात तब्बल 500 कोटी रूपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. त्या जप्तीकडे मणिपूरच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या कारवाईंपैकी एक म्हणून पाहिले जात आहे.
मोरेहमध्ये अंमली पदार्थांचा व्यापार सुरू असल्याचा सुगावा सुरक्षा आणि तपास यंत्रणांना लागला. त्यानंतर एक गोदाम त्या यंत्रणांच्या रडारवर आले. संशय बळावल्याने त्या गोदामावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी अंमली पदार्थांचा साठा हाती लागला. त्यामध्ये 54 किलो ब्राऊन शुगर आणि 154 किलो मेथाम्फेटामाईनचा समावेश आहे.
संबंधित कारवाईवेळी म्यानमारच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज (अंमली पदार्थ) रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी ड्रग्ज साठा जप्तीची संयुक्त कारवाई केली. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या काही गटांनी म्यानमारमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांच्यासाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशातून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा संशय आहे.