मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीने काही वर्षांपूर्वी डीआरएस नियम तयार केला. मैदानावरील पंचांचा एखादा निर्णय जर खेळाडूंना पटला नसेल तर त्याच्याविरोधात या नियमामुळे तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याची मुभा खेळाडूंना मिळते.
अनेकदा तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर शंका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग त्याविरोधातही दाद मागता येत नाही, त्यामुळे आयसीसीने या संपूर्ण नियमाचीच फेररचना करावी व त्यात आणखी सुधारणा करावी, अशी मागणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय खेळाडूंनी केलेले एक पायचीतचे अपील पंचांच्या कॉलमुळे फेटाळले गेले. खरेतर पंचांचा कॉल असावा का हाच मूळ प्रश्न आहे. जर अपील तिसरे पंच पाहणार असतील व त्यांनाच निर्णय घ्यायचा असेल तर मग मैदानावरील पंचांच्या कॉलला अर्थ उरत नाही.
ही प्रणाली किंवा हा नियम अद्यापही परिपूर्ण नसल्याचेच दिसून येत आहे. त्यात आता आयसीसीने सुधारणा करणे आवश्यक आहे, असेही सचिन म्हणाला.