जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत सदस्य आक्रमक
पुणे – जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती गंभीर असताना, त्यासंदर्भात आयोजित स्थायी समितीच्या बैठीकाला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे सदस्यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत, त्यांना दुष्काळाचे गांभीर्य कधी कळणार? असा संतप्त प्रश्न शिवसेनच्या गटनेत्या आशा बुचके यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी सभापती राणी शेळके, प्रवीण माने, सुजाता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, सदस्य शरद बुट्टेपाटील, रणजित शिवतरे, आशा बुचके यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील पाणी आणि चारा टंचाईबाबत चर्चा झाली. त्यावेळी एमएसईबी, सिंचन भवन, पाणी पुरवठा विभाग यांचे सक्षम अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, दुय्यम अधिकाऱ्यांना या बैठकीला पाठविल्यामुळे बैठक चांगलीच तापली.
“जिल्हाधिकारी हे टंचाई निवारणार्थ प्रस्ताव पाठवा मी तत्काळ मंजुरी देतो असा शब्द देतात. कॅबिनेटमंत्र्यांनी टंचाई निवारणार्थ काही अडचण येऊ नये, याबाबत सूचना दिल्या आहेत, पण कार्यवाही होत नाही’ असा आरोप आशा बुचके यांनी केला. त्यामुळे येत्या दोन दिवसांत निर्णय झाला नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात “मडके फोड’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिक्षकांच्या रिक्त पदे आणि त्यांना दिली जाणारी इतर कामांवर शिवतरे म्हणाले, “शिक्षकांना त्यांचे मूळ ज्ञानदानाचेच काम करू द्यावे. शिक्षण विभागात अनियमितपणे कामे केली जातात, शिक्षक स्वतः येऊन कामे करतात.’ तसेच बुचके यांनी उपशिक्षणाधिकारी हटाव अशी मागणी केली.