औरंगाबाद – यंदा मान्सून पाऊस समाधानकारक झाल्यानंतर देखील लातूर शहरावर दरवर्षीप्रमाणे तीव्र पाणीटंचाईची समस्या ओढवली आहे. यावर्षी पाण्याची उपलब्धता असून देखील आकारमानानुसार महाराष्ट्रातील १६वे मोठे शहर असलेल्या मराठवाड्यातील लातूरला १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. वीज शुल्क थकल्याने ‘महावितरण’ने वीज पुरवठा खंडित केला असून यामुळे गेल्या ६ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कार्यकारी अभियंता विजय चोखणे यांनी याबाबत, “एकूण ४.१९ कोटींचे वीज शुल्क थकले आहे. आम्ही यापूर्वी ५ लाख शहरवासीयांना सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करत असू मात्र आता परिस्थिती आणखी बिकट झाल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांतून एकदा केला जाणार आहे. थकलेलं वीज शुल्क कशाप्रकारे भरता येईल याबाबत तडजोडी सुरु आहेत.” अशी माहिती दिली.
याप्रकरणी पीटीआय या वृत्तसंस्थेने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासोबत सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही अशी माहिती दिली आहे. दरम्यान, ७० जागा असलेल्या लातूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी महापौर पदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे आहेत.