नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी आशा बुचके यांचा आंदोलनाचा इशारा
नारायणगाव-कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ आणि आता सत्तेचा दुष्काळ अशा परिस्थिती जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कुणाकडे जायचे, कुणाकडे मदत मागायची निवडून दिलेले प्रतिनिधी सत्तेच्या जमवाजमवीपायी डांबून ठेवले आहेत. शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी पॅकेज तर जाहिर केले पण ते फक्त कागदावरच राहिले. शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी प्रचंड असंतोष असून त्यांची नुकसान भरपाई त्वरित मान्य केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जि. प. सदस्या आशा बुचके यांनी दिला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, संपूर्ण वीजबिल माफ करावे, अष्टविनायक जोड रस्त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी जात आहेत, अशा शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा आदी मागण्यांसाठी आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव येथील बस स्थानकासमोरील चौकात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बेलत होत्या. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्षांचे नेते सत्तेच्या सारीपाटात वेगवेगळे डावपेच खेळताना दिसतात. पावसामुळे शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत अशी भयानक आर्थिक परिस्थिती ओढवली असताना राज्यात राष्ट्रपती राजवट केवळ सत्ता संघर्षामुळे लागू झाल्याचे पहावयास मिळते.
आजपर्यंत प्रशासनाने केलेल्या नुकसानीबाबतच्या पिक पंचनाम्यावर व हवामान खात्यांच्या नोंदणीनुसार राज्यात झालेल्या अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या सर्वच शेतमालांचे अनोतन नुकसान झाले. तरी जुन्नर तालुक्यात काही ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नाहीत. सर्व पिकच नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणेही अशक्य झाले आहे. आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय शेतकरी आत्मसात करतील अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात त्वरीत दिलासा रक्कम जमा करणे गरजेचे आहे.
यावेळी बाळासाहेब पाटे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, नारायणगावचे सरपंच योगेश बाबू पाटे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, ऋषी डुंबरे, जीवन शिंदे, आशिष माळवदकर, महेंद्र सदाकाळ, अजित वाघ, बंडू गाडगे, राजू चव्हाण, राजू मेहेर, विजय गायकवाड, शिवदास खोकराळे, संतोष दांगट, आरिफ आतार, हेमंत कोल्हे, संतोष बाळसराफ, सतीश पाटे, अनिल खैरे, गणेश पाटे, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई माळवदकर, सुरेखा गांजळे, पं. स. सदस्य काळू गागरे, समीर इनामदार, बन्सी चतुर, दिलीप भोर, संजय परदेशी, ओतूरचे सरपंच घुले, सतीश पाटे, विजय बनकर, अशोक पाटे, शिवदर्शन खत्री, अजित वाघ आदी पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले. कृषी विभाग, वीजवितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.