पुणे -जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दक्षिण भागातील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यांनी जुलैमध्येच पावसाची एकूण सरासरी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते बंद करण्यात आले. मात्र, पूर्व भागातील बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यात अजूनही पावसाने निम्मी सरासरीप गाठलेली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील काही गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे.
जिल्ह्यातील मुळशी आणि मावळ भागात दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. तसेच भोर, वेल्हा, जुन्नर आणि खेड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, मागील 24 तासात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पुरस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू सावरत आहे. मात्र, संततधार पावसामुळे मुळशी, पवना आणि खडकवासला धरणांतून विसर्ग सुरूच आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची रोपे पाण्याखाली गेली असून, “ओला दुष्काळ’ असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरीही पावसाने समाधानकारक हजेरी लावेली नाही. त्यामुळे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर हे तालुके अजूनही कोरड्या दुष्काळाची झळ सोसत आहेत. सद्यपरिस्थितीत या चार तालुक्यातील दीड लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी दररोज टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. पुरेसा चारा उपलब्ध नसल्यामुळे चारा छावण्यांमध्ये पशुंचे संगोपन केले जात आहे. त्यामुळे पाऊस एवढा का “रूसला’, “आता तरी आमच्यावर कृपादृष्टी कर’, अशी हाक येथील शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. किमान जमीन पाणी मुरण्याऐवढा तरी पाऊस होणे अपेक्षित आहे. अन्यथा अशीच परिस्थिती राहिली, तर या तालुक्यांतील पुढील वर्षीचा दुष्काळ भयानक असेल, अशी भीती वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील आजचा पाऊस (मिमीमध्ये)
हवेली-19, मुळशी-106.17, भोर-86, मावळ-102, वेल्हे-115.75, जुन्नर-42.22, खेड-33.33, आंबेगाव-18.84, शिरूर-3.33, बारामती-2.38, इंदापूर-0.25, दौंड-0.75, पुरंदर-8.43.