नगर – 1945-46 च्या दुष्काळात प्रथमच जिल्ह्यात ठिकठिकाणी जनावरांसाठी छावण्या काढण्यात आल्या त्यावेळी नवलमल फिरोदिया आणि एन. एन. सथ्था यांनी सेक्रेतरी म्हणून काम पाहिले. पुढे 1952-54 च्या दुष्काळात मोतीलाल फिरोदियांनी दुष्काळाशी दोन हात करतांना प्रशंसनीय कार्य केले. या दुष्काळात रामकृष्ण मिशनच्या वतीने गोरगरिबांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केले.
त्यानंतरचा 1972 सालचा दुष्काळ सर्वांना परिचितच आहे मात्र त्यानंतर दुष्काळाच्या सातत्यात वाढ होत गेली आता दर तीेन वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळात येथील जनता होरपऴतच असून जिल्ह्यात झालेल्या धरणांमुळे परिस्थीती काहिशी सुसह्य झाली असली तरी दुष्काळावर मात करणे मात्र अजुनही दृष्टीपथात येत नाही हीच खरी खंत आहे.72 च्या दुष्काळात नागरिकांना धान्य मिळण्याचीही मारामार झाली होती.
शिवाय पिण्याचे पाणीही रेल्वेने आणावे लागायचे मात्र या दुष्काळात नगर शहराचा एक मोठा फायदा झाला तो म्हणजे मुळाधरणाचे बरेचसे काम रोहगार हमीच्या माध्यमातून करण्यात आले. शिवाय नवनीतभाई बार्शीकरांनी याच काळात नगरला एम आय डी सी मंजूर करून आणली. या दोन गोष्टींमुळे या पुढील काळातील दुष्काळ जरातरी सुसह्य झाले अर्थात याचे सर्व श्रेय नवनीतभाई बार्शीकर यांना द्यावे लागेल.
1910 मध्ये ब्रिटीशांनी भंडारदरा धरणाची निर्मिती केली. त्यामळे जिल्ह्याच्या उत्तरे कडील भागाचा पाण्याचा प्रश्न काहीसा मार्गी लागला 1972 साली झालेले मुळाधरण हे नगर व आसपासच्या तालुक्यांसाठी वरदान ठरले. गेल्या 30 ते 40 वर्षात नगरजिल्ह्यातील निळवंडे, सीना, खैरी, घाटशीळ, आढळा, मांडओहोळ या मध्यम व लघु प्रकल्पांमुळे त्या -त्या ठिकाणचे पाणी प्रश्न काही अंशी सुटायला मदत झाली. मात्र अलिकडच्या काळात पर्जन्यमान कमी झाल्याने त्यातील काही प्रकल्प कोरडे ठाक पडतात. त्यात जिल्ह्याची वाढलेली लोकसंख्या यामुळे दुष्काळावर मात करण्यात पुरते यश आलेले नाही.
सध्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून नद्या, नाले, ओढे साफ सफाईचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.त्यामुळे गेल्यावर्षी त्याचा चांगला फायदाही झाला मात्र या वर्षी पाऊसच कमी झाल्याने आडातच आनी तर पोहऱ्यात कोठून येणार अशी परिस्थिती झाली आहे. शिवाय आता दुष्काळाची चाहूल लागताच त्या-त्या भागातील नेते मंडळीही टॅंकरची, चारा छावण्यांची मागणी करतातशिवाय रोजगार हमी योजनाही असतेच. गेल्या काही वर्षापूर्वी पडलेल्या दुष्काळातही मोठ्या प्रमाणावर पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आले मात्र जिल्ह्यात सुरू झालेल्या कारखानदारी मुळे रोजगार हमी योजनेवर जाण्यास फारसे लोक उत्सुक नसायचे.
मात्र गेल्या वर्षापासून चित्र पुन्हा पालटतेय आता पुन्हा नागरिक रोजगार हमीच्या कामाची मागणी करू लागले आहेत.
2018 च्या दुष्काळात 315 टॅंकर द्वारे 256 गावांतील 1300 वाड्या वस्त्यांवरील 5लाख64 हजार 452 लोकांना पाणी पुरवठा करण्यात आला. तर या वर्षी 822 टॅंकरच्या माध्यमातून 566 गावातील 3182 वाड्यावस्त्यांवरील 13 लाख 43 हजार 579 नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे शिवाय यंदा 501 चारा छावण्यातून 3लाख 32हजार14 जनावरांचे पालन पोषण केले जात आहे. तर रोजगार हमी योजनेच्या कामावरही मोठ्याप्रमाणावर लोकांनी हजेरी लावली आहे.
पूर्वीच्या काळी जेव्हा -जेव्हा दुष्काळ पडायचा त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते,राजकिय नेते लोकांच्या मदतीला धावून गेल्याचे पहायला मिळाले.मिळे तेवढ्या निधीतून प्रामाणिक पणे लोकांच्या गरजा भागवायचे मात्र अलिकडच्या काळात या वृत्त्तीतही बदल झाल्याचे जाणवते. अगदी गेल्याच वर्षी शेकडो छावणी चालकांवर गुन्हे नोंदविले गेले हे कशाचे द्योतक म्हणायचे.