21 हजार जनावरे छावण्यांमध्ये : 18 हजार लोक रोजगार हमीच्या कामावर
आमदारांच्या गावात चारा छावणी
सर्वाधिक चारा छावण्यांची संख्या माण तालुक्यात आहे. विशेषत: माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या बोडके-बोराटवाडी गावामध्ये देखील एक चारा छावणी उभारावी लागली आहे. श्रीनाथ मजूर सह. संस्था, पाचवड यांच्यावतीने छावणी चालविण्यात येत आहे. सध्या छावणीमध्ये लहान 26 आणि मोठी 375 अशी एकूण 401 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.
सातारा – जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली आहे. माण-खटावमधील 32 चारा छावण्यांमध्ये 21 हजार लहान-मोठी जनावरे दाखल करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 18 हजारांपेक्षा अधिक लोक रोजगार हमीच्या कामावर जात आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 186 गावे आणि 776 वाड्यावस्त्यांवरील 3 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना 222 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये दुष्काळाची भीषणता अधिक वाढण्याची शक्यता असून टॅंकर, चारा छावण्यांच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे.
सर्वाधिक धरणांचा जिल्हा असून देखील सातारा जिल्ह्यातील दुष्काळ राज्यकर्त्यांचे कर्तृत्व स्पष्ट करीत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता पाऊस सुरू होण्यास अद्याप एक ते दिड महिना बाकी आहे. पार्श्वभूमीवर दुष्काळाचे ढग अधिक गडद होणार आहेत. मात्र, सध्या जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला असता सरकार आणि प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे.
सध्या, जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये सर्वाधिक 30 तर खटाव तालुक्यात 1 अशा एकूण 31 चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. 31 छावण्यांमध्ये 20 हजार 907 जनावरे दाखल झाली आहेत. त्यामध्ये लहान जनावरांची संख्या 3 हजार 240 तर मोठी जनावरे 17 हजार 667 इतकी आहेत. सर्वाधिक 8 हजारापेंक्षा अधिक जनावरे माणदेशी फाउंडेशनच्या छावणीमध्ये दाखल झाली आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात दुष्काळाच्या भीषणतेखाली 1 लाख 46 हजार पशुधन बाधित झाले आहे तर 3 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना 222 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
त्यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यातील 74 गावे व 558 वाड्यांना 107 टॅंकर तर खटाव तालुक्यातील 44 गावे व 150 वाड्यांना 39 टॅंकर, कोरेगाव तालुक्यातील 28 गावांना 31 टॅंकर, खंडाळा तालुक्यातील 2 गावांना 2 टॅंकर, फलटण तालुक्यातील 20 गावे व 55 वाड्यांना 25 टॅंकर, वाई तालुक्यातील 8 गावे आणि 4 वाड्यांना 6 टॅंकर, पाटण तालुक्यातील प्रत्येकी 1 गाव व वाडीला 4 टॅंकर, जावली तालुक्यातील 2 गावे व 3 वाड्यांना 7 टॅंकर, महाबळेश्वर तालुक्यातील 3 गावे व 2 वाड्यांना 4 टॅंकर, कराड तालुक्यातील 3 गावांना 7 टॅंकर आणि सातारा तालुक्यातील 1 गाव आणि 3 वाड्यांना एका टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हाताला रोजगार मिळावा यासाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेत 18 हजार नागरिक सहभागी झाले आहेत. नागरिकांना प्रति दिवस 206 रूपये इतका मोबदला दिला जात आहे. सर्वाधिक खटाव तालुक्यातील 49 कामांमध्ये 3 हजार 906 नागरिक सहभागी झाले आहेत. त्यापाठोपाठ कराड तालुक्यात 142 कामांमध्ये 2 हजार 720, पाटण तालुक्यात 70 कामांमध्ये 2 हजार 606, फलटण तालुक्यात 67 कामांमध्ये 1 हजार 502, खंडाळा तालुक्यात 37 कामांमध्ये 1 हजार 326, कोरेगाव तालुक्यात 34 कामांमध्ये 1 हजार 824, माण तालुक्यात 38 कामांमध्ये 1 हजार 584, महाबळेश्वर तालुक्यात 8 कामांमध्ये 1 हजार 242, जावली तालुक्यात 1 कामांमध्ये 30, सातारा तालुक्यात 23 कामांमध्ये 990, वाई तालुक्यात 38 कामांमध्ये 725 नागरिक सहभागी झाले आहेत. दरम्यान, येत्या काळात दुष्काळाची भीषणता वाढत राहिली तर रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. साहजिकच ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी ठरणार आहे.