पुणे – पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील काही तालुक्यांमध्ये पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला नसल्याने येथील पेरणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे पूर्व भागातील 1 लाख 7 हजार 739 हेक्टरवर अद्यापही पेरणी झालेली नाही. त्यामुळे या पट्ट्यातील शेती उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसाकडे या टप्प्यातील शेतकऱ्यांना मोठी आशा आहे.
यंदा खरीप हंगामात पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी या हंगामातील पेरणीचे नियोजन केले होते. मात्र, पावसाने उशिरा लावलेल्या हजेरीने शेतकऱ्यांचे पेरणीचे वेळापत्रक बिघडविले. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही.
मात्र, अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्याच्या भरवशावर पेरण्यांची जोखीम घेतली आहे. सध्या ही पिके वाढण्याच्या स्थितीत आहेत. आतापर्यंत सरासरीच्या 2 लाख 30 हजार 826 हेक्टरपैकी 1 लाख 33 हजार 87 हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीची ही आकडेवारी 53 टक्के एवढी आहे.
जनावरांच्या चाऱ्यात 40 टक्क्यांनी घट
यंदा पश्चिम पट्ट्यातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांच्या पश्चिम पट्ट्यात सुमारे 38 हजार 234 हेक्टरवर भाताची पुनर्लागवड करण्यात आली; तर अद्यापही 34 हजार 713 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणे बाकी आहे. शेतीबरोबरच अनेक शेतकऱ्यांकडून जनावरांच्या चाऱ्याकरीता मक्याची लागवड केली जाते मात्र, अवघ्या 6 हजार 627 हेक्टरवर ही पेरणी झाली असून, यामध्ये पावसाअभावी 40 टक्क्यांची घट झाली आहे. बाजरीचे सरासरी 44 हजार 94 हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी फक्त 30 हजार 673 हेक्टरवर पेरणी झाली आहे. बाजरीचे 13 हजार 421 हेक्टरक्षेत्र अद्यापही पेरणीपासून वंचित आहे.
अन् दुसरीकडे अतिपावसाचाही फटका
अति पावसाचा जिल्ह्यातील 57 हजार 51 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे 27 हजार 618 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका भात उत्पादनाला बसण्याची सर्वाधिक शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाताचे भाव वधारण्याची शक्यता आहे.