मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच होत असणाऱ्या दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यासाठी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक गट आणि एकनाथ शिंदे समर्थक गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता मनसेने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र ही मागणी उपहासात्मक पद्धतीने करण्यात आली असून शिवसेनेच्या मेळाव्याचा उल्लेख ‘टोमणे मेळावा’ असा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही संदर्भ मनसेने शिवसेनेवर टीका करताना दिला आहे. मनसेचे प्रवक्ते गजाजन काळे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा ‘टोमणे प्रमुख’ असा तर शिवसेनेचा ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. मुंबई महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिल्यास भाषणातून होणाऱ्या मनोरंजनापासून जनता वंचित राहणार नाही असा टोला मनसेच्यावतीने काळे यांनी लगावला आहे.
“मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने ‘शिल्लक सेने’च्या टोमणे मेळाव्याला एकदाच काय ती परवानगी देऊन टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, निष्ठा, गद्दार यापासून महाराष्ट्राच्या होणाऱ्या मनोरंजनापासून जनतेला वंचित करु नये, अशी आग्रहाची विनंती,” असे गजानन काळे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
काळे यांनी उद्धव ठाकरेंचे मेळाव्यातील भाषण हे बारामतीवरुन आले असणार असा टोला लगावत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “ज्यापद्धतीने ते (उद्धव ठाकरे) अडीच वर्षांमध्ये गेले ते पाहता ‘टोमणे प्रमुखांची’ या वेळेची स्क्रीप्ट बारामतीवरुनच आहे. फक्त हिंदुत्वाला तिलांजली वाहिल्यानंतर ‘शिल्लक सेना’ अबू आझमी आणि ओवैसी यांना सुद्धा स्टेजवर बोलवणार आहे का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनी या प्रश्नाचं महाराष्ट्राला उत्तर द्यावं,” अशी मागणी काळे यांनी केली आहे.