नवी दिल्ली – दारू पिऊन वाहन चालवणे हे केवळ गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन नसून तो गुन्हाही आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. दारूच्या अमलाखाली असताना कोणालाही वाहन चालवण्याची परवानगी देता येणार नाही. दारूच्या अमलाखाली गाडी चालवणे आणि इतरांच्या आयुष्याशी खेळणे हे अत्यंत गंभीर गैरवर्तन आहे, असे न्या. एम. आर. शहा आणि बी. व्ही. नागरथाना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
दारूच्या नशेखाली ट्रक चालवणाऱ्या कर्मचाऱ्याला सक्तीने निवृत्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हा चालक वाहनातून 2000 मध्ये पोलिसांना कुंभ मेळ्याच्या बंदोबस्तासाठी जात होता त्यावेळी या वाहनाला अपघात झाला होता. सशस्त्र पोलीस दलातील कर्मचाऱयांना घेऊन जात असताना दारूच्या अमलाखाली असणे हे गंभीर गैरवर्तन आहे विशेषतः लष्कर सारख्या शिस्तीच्या संस्थेत हे गैरवर्तन खपवून घेऊ नये असेही मत न्यायालयाने व्यक्त केले.
चालक ब्रिजेश चंद्र द्विवेदी यांच्या कुटुंबीयांनी असा दावा केला की यातील चालक मरण पावला आहे.या अपघातात फारशी हानी झाली नाही त्यामुळे शिस्तपालन समितीने केलेली कारवाई अयोग्य आहे. हा किरकोळ अपघात आहे, हे दया दाखवण्याचे कारण ठरू शकत नाही. केवळ नशीब चांगले म्हणून या अपघातात जीवित हानी झाली नाही. वाहनातून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱयांच्या जीविताची जबाबदारी चालकांवर असते. त्यामुळेच त्यांनी अन्य लोकांच्या जीविताशी खेळले असे म्हणावे लागते, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
खंडपीठाने त्याची शिक्षा बडतर्फी तुन कमी करून सक्तीने निवृत्ती अशी केली. त्याने 25 वर्ष सेवा बजावली आहे, त्याचा विचार करून हा निर्णय दिला.