पुणे – रस्ते अपघातांना अनेकदा वाहनचालकांची एक चूक कारणीभूत ठरते. यामध्ये स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी न घेता हेल्मेटचा वापर न करणे, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, रस्त्यांची दुर्दशा आदी बाबी जबाबदार असतात. यामुळे नागरिकांना नाहक जीव गमवावा लागतो. प्रामुख्याने तरुणांचा हलगर्जीपणा अपघातांना कारण ठरत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील काही प्रमुख कारणे.
रस्त्यांच्या दुरवस्थेचे बळी
अनेकदा रस्त्यांवरील खड्डे, सुरू असणाऱ्या विकासकामांचा राडारोडा, रस्त्यांवर सांडलेले ऑईल आदी कारणे नागरिकांचा प्राण जाण्यास कारणीभूत ठरत आहेत. प्रामुख्याने अरुंद रस्ते अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहेत. अरुंद रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी आणि बेशिस्त पार्किंगही जबाबदार आहे.
निष्काळजीपणा
पावसाळ्यामध्ये रस्ते निसरडे होतात. पर्यायाने दुचाकी घसरण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर हेल्मेट घातले नसल्यास निष्काळजीपणा जीवावर बेतण्याची शक्यता वाढते.
स्वसुरक्षा आवश्यक
वाहनचालकांनी स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहनाची वेगमर्यादा नियंत्रित ठेवणे, हेल्मेटचा वापर करणे, सीटबेल्ट लावणे, ओव्हरटेक न करणे आदी प्रकारांतून वाहनचालकांनी स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालविताना काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. तसेच अपघात झाल्यास गंभीर इजा होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
स्पीड जीवावर बेततोय
“बाईक’च्या “क्रेझ’मुळे दिवसेंदिवस गाडी चालविताना “ओव्हरस्पीडींग’चे प्रमाण वाढत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. कोणताही विचार न करता गाडी “बुंगाट’ चालविणे तरुणाईच्या जीवावर बेतत आहे. गाडीचा वेग वाढवल्याने नियंत्रण सुटण्याची शक्यता अधिक असते. पर्यायाने वेग जीवावर बेतण्याची शक्यता असते. शहरांसह महामार्गावर घडणाऱ्या अपघातांना वेग कारणीभूत ठरत आहे.