मुंबई –आयपीएलसाठी ड्रीम 11 या कंपनीला मुख्य प्रायोजकता मिळाली असली तरीही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भरतेच्या हाकेला धक्का बसला आहे. चिनी कंपनीकडे प्रायोजकत्व नको हे मान्य करत बीसीसीआयने निविदा प्रक्रियेत ड्रीम 11 ला करार दिला गेला. मात्र, या कंपनीतही चीनच्या काही कंपन्यांची गुंतवणूक असल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
आयपीएलच्या यंदाच्या ड्रीम 11 च्या प्रायोजकतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या घोषणेलाच धक्का बसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीसीसीआय लक्ष्य होण्याची शक्यता आहे.
चीनबाबत देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यावरूनच बीसीसीआयवर व्हिवोशी असलेला करार मोडण्यासाठी दडपण येत होते. त्यांनीही जनभावना लक्षात घेत हा करार मोडला. निविदा प्रक्रियेत ड्रीम 11 ने 222 कोटी रुपयांची बोली लावून हक्क प्राप्त केले. मात्र, या कंपनीतही चिनी कंपन्यांची गुंतवणूक असल्यामुळे पंतप्रधानांच्या घोषणेलाच हरताळ फासला गेल्याचे सांगितले जात असून येत्या काळात पुन्हा एकदा बीसीसीआयवर टीका सुरू होणार आहे. देशी कंपन्यांना प्रोत्साहन द्यावे व परदेशी विशेषतः चिनी कंपन्यांना दूर ठेवावे, असा उद्देश आत्मनिर्भर भारत या
घोषणेचा होता.
ड्रीम 11 टीकेचे लक्ष्य होणार
ड्रीम 11 ही जरी एक कंपनी असली तरीही ते मुळात क्रिकेट ऍप आहे. या कंपनीतही चीनच्या काही उद्योग समूहांची गुंतवणूक आहे. ज्या कारणाने चीनच्या व्हिवो कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व सोडावे लागले होते, तेच कारण ड्रीम 11 बाबतही वाद निर्माण करू शकते. बिहार क्रिकेट संघटनेचे सचिव आदित्य वर्मा यांनी हीच गोष्ट लक्ष्य केली असून येत्या काळात बीसीसीआयवर व ड्रीम 11 वर टीका सुरू होण्याचीही चिन्हे दिसत आहेत.