नवी दिल्ली – श्रीलंकेविरुद्धच्या 2009 साली झालेल्या मुंबईतील कसोटी सामन्यात त्रिशतक पूर्ण करण्याची संधी राहुल द्रविडच्या चुकीच्या सल्ल्यामुळे हुकली, असा गंभीर आरोप भारताचा माजी कसोटीपटू व सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने केला आहे. या सामन्यात सेहवाग दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा द्रविड 82 तर सेहवाग 284 धावांवर नाबाद राहिला होता. हा खेळ थांबायला 3 ते 4 षटके बाकी असताना आता आक्रमक फलंदाजी करू नकोस फक्त दिवसातील उर्वरित षटके खेळून काढ असा सल्ला द्रविडने दिला.
त्यावेळी जितकी षटके राहिली होती त्यात 16 धावा सहज काढता आल्या असत्या व कारकिर्दीतील तिसरे विक्रमी त्रिशतक पूर्ण झाले असते. मात्र, केवळ द्रविडचा सल्ला ऐकला व ही कामगिरी पूर्ण होऊ शकली नाही, असेही सेहवागने द्रविडला लक्ष्य करताना सांगितले.
2004 साली पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत त्रिशतकी खेळी केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सेहवाग पहिलाच भारतीय फलंदाज ठरला होता. त्याच्या नावावर कसोटीत 2 त्रिशतके नोंदलेली आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या त्या कसोटीत जर त्याचे त्रिशतक झाले असते तर कसोटीत 3 त्रिशतके फटकावणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला असता. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला व आपल्या धावसंख्येत केवळ 9 धावांची भर घालून सेहवाग 293 धावांवर बाद झाला व तिसरे त्रिशतक साकार करण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. या घटनेला 11 वर्षे झाल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना सेहवागने याबाबत खुलासा करताना हुकलेल्या शतकाला द्रविडलाच जबाबदार धरले आहे.
सचिन भेटवस्तू देणार होता..
श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात तू जर त्रिशतक पूर्ण केलेस तर तू जे मागशील ते देईन, असे वचन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मला दिले होते. त्रिशतक हुकल्याने सचिनकडून मिळणारी भेट देखील मी गमावली. त्रिशतक हुकल्याची तसेच सचिनकडून मिळणारी भेट गमावल्याचे शल्य मला आजही वाटते, असेही सेहवागने स्पष्ट केले.