नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकीत आता लव्ह जिहाद, काऊ टेरर असे विषय चालणार नाहीत, हे कृत्रिम विषय आहेत हे लोकांच्या लक्षात आले आहे. आता शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजपने केलेली डोळे झाक त्यांना आता महागात पडेल असे राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आता देशाचे सारे लक्ष सन 2022 साली होणाऱ्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकांवर केंद्रीत व्हायला लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकदल पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष जयंत चौधरी म्हणाले की, आम्ही आता या हिंदीभाषिक प्रदेशातील राज्यात पुन्हा धार्मिक धृवीकरणाचे प्रयोग चालू देणार नाही. ते आज पीटीआयशी बोलत होते.
ते म्हणाले की, आमचे समाजवादी पक्षाचे घनिष्ट संबंध आहेत. आणि आमची ही आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे असे ते म्हणाले. तथापी त्याचा तपशील अजून ठरणे बाकी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. महागठबंधन मध्ये बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेस असणार काय असे विचारता ते म्हणाले की, भाजपसारख्या धर्मांध पक्षाशी जो कोणी प्रामाणिकपणे विरोधात लढू इच्छितो अशा पक्षांबरोबर महागठबंधन होऊ शकते. उत्तरप्रदेशातील भाजपच्या पक्षाने अर्थकारण , विकास, रोजगार, चांगले प्रशासन या सर्वच बाबतीत निराशा केली आहे.
कोविडच्या काळात तर या सरकारचा कमालीचा गलथानपणा दिसून आला असून गंगेतून वाहिलेले मृतदेह कोणीही विसरू शकत नांही. भाजपने आता केवळ आपल्या अपयशावरील लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी नेतृत्त्व बदल, मंत्रिमंडळ विस्तार असे विषय पुढे केले असले तरी त्याचा आता काही एक उपयोग होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.