इंदापुरात परतीच्या पावसाने पाणी प्रश्न तात्पुरता मिटला
रेडा – इंदापूर तालुक्यात गेल्या पाच ते सहा वर्षाच्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच परतीचा पाऊस समाधानकारक झाल्याने वडापुरी परिसरातील ओसाड पडलेले ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत यामुळे परिसरातील विहिरी व कुपनलिकांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने पाणी प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटला आहे.
इंदापूर तालुक्यात दुष्काळाची समस्या कायमच भेडसावत असते, त्यामुळे शेतकरी आणि येथील नागरिक पाण्याच्या टंचाईने त्रस्त असतात. या वर्षीही सुरुवातीच्या काळात पाऊस कमी होता; पण परतीच्या पावसाने या भागात चांगली हजिेरी लावली, त्यामुळे ठिकठिकाणी ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत.
याबरोबरच विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यावर्षीचा पाण्याचा प्रश्न मिटणार असून खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार असल्याचे युवा शेतकरी अमोलराजे इंगळे व प्रतीक घोगरे यांनी सांगितले.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाण्याचा प्रश्न फार गंभीर बनला होता, विहिरींसह कूपनलिका आणि या परिसरातील ओढे कोरडे पडले होते; धरणातून पाण्याची आवर्तनेही कमी होती; परंतु आता परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम वाया गेला असला तरी खरिपाच्या पिकांना या पाण्याचा फायदा होणार असल्याने काटी, रेडा, रेडणी, अवसरी, बाभूळगाव, बेडशींग, भांडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.