नगर -काटवन खंडोबा येथील गाझीनगरला अनेक दिवसापासून ड्रेनेजलाइन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार पसरत आहे. दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असताना स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. हा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करुन, नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणी निवेदनाद्वारे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली आहे.
काटवन खंडोबा येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाइन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाऊस आल्यानंतर काही नागरिकांच्या घरात देखील हे मैलमिश्रीत पाणी शिरत आहे. वारंवार मनपा प्रशानाला कळवून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांच्या संतप्त भावना आहे. ड्रेनेजच्या पाण्याचे डबके साचले आहे. या भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. तर अस्वच्छता, दुर्गंधी व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
करोनाच्या नावाखाली मनपा सर्वसामान्यांच्या इतर आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून, या भागात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ड्रेनेजलाईन दुरुस्त करण्यासाठी मनपा कर्मचारी येऊन गेले. मात्र मैलमिश्रीत पाणी उपसा करणाऱ्या गाडीचा जेट अनेक दिवसापासून दुरुस्त नसल्याने काही करता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.
महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून, ड्रेनेजलाइन दुरुस्ती होण्यासाठी तातडीने उपाय योजना करुन गाझीनगर भागातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी आशा गायकवाड, हसीना शेख, समिना शेख, आयेशा बागवान, रेशमा बागवान, मनिषा शिंदे, हाजराबी शेख, नारायण दातरंगे, वसिम शेख, खलिल शेख, नजीर पठाण, शाहीन शेख, फरीदा शेख आदिंसह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आमदार जगताप यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.