प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताचा धोका
पिंपळे गुरव – दापोडी परिसरात विविध ठिकाणी महावितरणाने विद्युतपुरवठा करण्यासाठी रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) बसविली आहेत. परंतु विद्युत रोहित्रांच्या आजूबाजूला मोठमोठी झाडे, वेली, गवत उगवले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी महावितरणाने शहरात उभारण्यात आलेल्या रोहित्रांची देखभाल व्यवस्थित करणे गरजेचे आहे. महावितरणाचा हलगर्जीपणा स्थानिक नागरिकांच्या जिवावर बेतू शकतो.
विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरणाने ट्रान्स्फॉर्मर उभारले आहेत. परंतु त्यांची व्यवस्थित देखभाल करणे ही महावितरणाचे महत्त्वाचे जबाबदारी आहे. परंतु महावितरणाचे स्थानिक कर्मचारी आणि पदाधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.
रोहित्राच्या आजूबाजूला झाडेझुडपे, गवत उगावले आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतो. रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट झाले तर झाडेझुडुपे व गवत पेट घेऊन मोठी आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून येथून ये-जा करावी लागत आहे.
परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे रोहित्रे नागरी भागात बसविले आहेत. येथे नागरिक, लहान बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अशी घटना घडली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे महावितरणाने याची त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी, स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
महावितरणाने लवकरात लवकर याची दखल घेऊन परिसर स्वच्छ करावा. एखादी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, यासाठी मनसेचे उप विभाग अध्यक्ष ऍलेक्स आप्पा मोझेस, दिलीप ठोंबरे, सागर भोकरे, सिद्देश वाघमारे, प्रशांत सांगळे, अमित झिटे, सतीश मात्मार्थी, पंकज ओव्हाळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन
दिले आहे.
या ठिकाणाचे रोहित्रांना वेढले वेलींनी
सांगवी-दापोडी रोड
शिवाजी महाराज चौका समोरील भागात
मुंबई-पुणे महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ
यांत्रिक भवन एसटी रोड
सुंदर बाग रेल्वे स्टेशन मार्ग
सिद्धी टॉवर बी विंग मार्ग
सुखवानी गार्डन गणेशनगर