उद्धव ठाकरेंचे निर्देश ः रस्त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला
मुंबई : राज्यभरातील रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धती ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागातील मनुष्यबळ विभागामार्फत सुरू असलेल्या राज्य व प्रमुख जिल्हा मार्गांची कामे, मुंबई-पुणे महामार्गावरील नवीन टनेल मार्ग, हायब्रीड न्युइटी योजना, शासकीय इमारती, मंत्रालयाचे आधुनिकीकरण, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे वर्सोवा सी लिंक, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हरित इमारत प्रकल्प आदी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते असे सुमारे 3 लाख किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पारंपरिक पद्धत वापरली जाते. या रस्त्यांचा दर्जा वाढावा, ते दीर्घकाळ टिकावेत, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर रस्ते विकासात करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
रस्त्यांच्या कामासाठी जागतिक बॅंकेकडून सुलभ कर्ज उपलब्ध होते का, याबद्दलही प्रस्ताव सादर करावेत. शासकीय निवासी इमारतींच्या दुरुस्तीवर भर देण्यात यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सादरीकरण केले. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, आमदार अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) अजित सगणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.