नगर – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्याकडे समाजाकडे पाहण्याचे कौशल्य होते. त्यांनी जो पाया रचला, त्यामुळे शेतकऱ्यांना दिशा मिळाली आहे. ते स्वतःच मार्गदर्शक होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे शक्य होईल, तेवढे त्यांनी केले. शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. शेतकऱ्यांचे ते कैवारी होते. पद्मश्री यांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य फुलवले, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले.
नगर कृषी (आत्मा) यांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे (पद्मश्री प्राप्त) यांची जयंती शेतकरी दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी उपसंचालक विलास नलगे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, आत्माचे उप प्रकल्प संचालक अनिल गवळी, प्रगतशील शेतकरी विष्णू जरे, नाथा देशमुख, रवींद्र माळी, सूर्यकांत शेकडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
जगताप म्हणाले की, शेती करणे हे एक पवित्र काम आहे. शेती व शेतकरी कधीही न संपणारी प्रक्रियाच आहे. डॉ. विखे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम सुफलाम झाले.कृषी उपसंचालक विलास नलगे म्हणाले की, डॉ. विट्ठलराव विखे पाटील यांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करीत राज्याला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. पहिला साखर कारखाना सुरू करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. सहकार चळवळ अधिक मजबुतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा, यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूपच उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचे काम केले.