मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी देऊनही अर्ज दाखल न केल्यावरून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. झालेल्या प्रकारानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
सुधीर तांबे यांनी निलंबनाच्या कारवाईनंतर बोलताना,“मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला कारवाईबाबत समजलं. मात्र, या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही.”असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसने सुधीर तांबेंवरील निलंबनाच्या कारवाईचे पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष अर्ज भरायला मदत केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला होता.
डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबतची फसवणूक आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. त्यातच तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.