भोर येथे पाचव्या फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संमेलनाचा समारोप
भोर – समाज परिर्वतनाचे विचार हे निखाऱ्या प्रमाणे असतात. निखारे धगधगते असतात पण जस जसा काळ बदलत जातो, तसतसे त्या निखाऱ्यावर राख साठत जाते. त्यावर फूकर मारली नाही तर त्या निखार्याचा कोळसा होयाला वेळ लागत नाही असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉं. नागनाथ कोत्तापल्ले यानी केले.
रविवारी (दि. 24) येथील फूले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ व समविचारी संस्था, संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 5 व्या फूले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, संयोजन समितीच्या अध्यक्षा सुनंदा गायकवाड, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, तुकाराम रेगटे, डॉ. अरुण बुरांडे, डॉ. प्रदीप पाटील, आबासाहेब थोरात, कॉ. ज्ञानोबा घोणे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, सतिश कुलकर्णी, रावसाहेब पवार, प्रा. सुजित चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्व समाज जाती-पाती मध्ये विभागला आहे. त्या सर्व समाजाने राज्यघटनेने दिलेल्या समतेच्या संदेशाने वाटचाल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जीवनामध्ये फूले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करून लोकशाही मार्गाचा अवलंब केला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी यावेळी व्यक्त केले.
या साहित्य संमेलनात डॉ. प्रदिप पाटील लिखीत (तात्पुरते गांधी), डॉ. संजय गायकवाड लिखित (शिक्षण आणि रोजगार), या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संतोष ढवळे यांनी संपादित केलेल्या सुर्यफूले या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. डॉ. प्रसन्न देशमुख यांनी संमेलनाचे प्रस्ताविक केले. सुजाता भालेराव व आनंदा जाधव यांनी सुत्रसंचालन केले. सुनंदा गायकवाड यांनी आभार मानले.