बारामती – वाफगाव (ता. खेड) येथील रयत शिक्षण संस्थेची शाळा महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ल्यामध्ये चालू आहे. वाफगाव किल्ल्याची भारताच्या इतिहासात नोंद असून या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मराठा साम्राज्याचे संस्थापक मल्हाराव होळकर, राजे यशवंतराव होळकर, राजे तुकोजी होळकर यांचे याठिकाणी वास्तव्य होते.
होळकर संस्थानचा राज्यकारभार याच किल्ल्यातून चालत होता, परंतु या किल्ल्याकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. सदर किल्ला हा सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या काळापासून होळकर शाहीचा व मराठा साम्राजाचा वारसा आहे. 1955 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने हा किल्ला शिक्षण संस्थेने ताब्यात घेतला खरे तर मूळ ऐतिहासिक वास्तूची जपणूक करण्याच्या अटीवर सदरची जागा संस्थेला वापरायला दिली होती. परंतु गेली साठ वर्षात या किल्ले व परिसराची खूप पडझड झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जपण्यास संस्था कमी पडली आहे.
तसेच मुख्य किल्ल्याच्या वास्तूचे पावित्र्य भंग करून अनेक नवीन इमारती शौचालय व इतर बांधकाम रयत शिक्षण संस्थेने किल्ल्यात केल्यामुळे किल्ल्याच्या पावित्र्यात धोका निर्माण झाला आहे. हा किल्ला यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असल्यामुळे धनगर बहुजन समाजाची अस्मिता राहिलेली राहिलेली आहे. राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांकडून जाणूनबुजून होळकरांच्या वास्तू दुर्लक्षित ठेवल्या आहेत. त्यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे.
“साहेब आपण या संस्थेचे अध्यक्ष आहात” या प्रकरणी आपण लक्ष घालून रयत शिक्षण संस्थेच्या शाळेचे किल्ल्याबाहेर स्थलांतर करावे. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आम्हाला सुद्धा समाजातून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ही शाळा इथून स्थलांतरित करावी संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज 3 डिसेंबर यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त येत असतो. त्यामुळे आपण याकडे लक्ष देऊन या किल्ल्याला स्मारक घोषित करून हा किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात घेऊन किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून किल्ले संवर्धनासाठी 50 कोटीचा निधी जाहीर करून ऐतिहासिक वास्तूचे जतन करावे, अशी मागणी धनगर समाजाची आहे.
या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ अर्चना पाटील, दौंड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी चे निरीक्षक, बापुराव सोलनकर, श्रीमंत महाराजा होळकर स्मारक समितीचे महासचिव भगवान जऱ्हाड, कार्य अध्यक्ष, नवनाथ बूळे, कोषाध्यक्ष योगेश राजे होळकर यांच्याही पत्रावर सह्या आहेत.