करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी “रिपाइं’चे आंबेडकरी जनतेला आवाहन
पुणे – पुण्यासह राज्यात आणि देशात करोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात गर्दी करून करोनाला पोषक वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबीयांसह घरच्याघरी साजरी करत अभिवादन करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या वतीने आंबेडकरी जनतेला करण्यात आले आहे.
“रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी पत्रक काढून राज्यभरातील आंबेडकरी कार्यकर्ते आणि समाजाला जयंतीनिमित्त गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. विविध पक्षाचे कार्यकर्ते, सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना यांनी पुतळ्यावर जमा होऊ नये, मिरवणुका काढू नयेत, रस्त्यावर येऊन गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम करू नयेत, असे या पत्रकात म्हटले आहे. करोनाचा उद्रेक पूर्णपणे कमी झाल्यानंतर जयंती साजरी करावी, असेही यात म्हटले आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, परशुराम वाडेकर, ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी आदींनीही हे आवाहन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट आज सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरच्या घरी साजरी करावी, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभाग, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने सामाजिक न्याय विभाग भारत सरकार निर्मित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर – द अनटोल्ड ट्रुथ’ हा चित्रपट मंगळवारी (14 एप्रिल) दुपारी
1.30 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र प्रत्यक्ष अनुभवावे, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.