नेवासा: विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त नेवासा येथ कवी व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या आयोजित व्याख्यान कार्यक्रमाला नेवासकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गांधींच्या नोटा खिशात येण्यासाठी डॉ.बाबासाहेबांना मेंदूत तर छत्रपती शिवरायांना मनगटात घ्या असे आवाहन नितीन चंदनशिवे यांनी झालेल्या व्याख्यान प्रसंगी बोलताना केले.
नेवासा येथील एस टी स्टॅण्ड जवळील प्रांगणात नितीन चंदनशिवे यांच्या झालेल्या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नितीन चंदनशिवे व पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, आयोजक अँड. संजय सुखदान, अँड.बन्सीभाऊ सातपूते, भेंडे येथील गोर्डे सर, उत्सव समितीचे सदस्य मुन्नाभाई शेख, जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे, प्रा. देविदास साळुंके, अजय त्रिभूवन यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांसह आलेल्या सर्वधर्मीय नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे कार्यक्रमाचे संयोजक अँड. संजय सुखदान यांनी स्वागत केले. या प्रसंगी व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते तर अँड. संजय सुखदान यांच्या हस्ते पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी “भारतरत्न विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो””जय भीम”जय भीम”असा जयघोष करण्यात आला.
यावेळी झालेल्या व्याख्यानात बोलताना नितीन चंदनशिवे म्हणाले की, आजच्या परिस्थितीत प्रत्येक जण पेटला मात्र वातावरण नकली आहे, शाहीर वामनदादा कर्डक यांनी अडचणीच्या काळात बाबासाहेबांची चळवळ गाव खेड्यात पोहचवली, त्यामाध्यमातून त्यांनी बाबासाहेबांना पेरण्याचे काम केले. आजची पोर वाचायची बंद होऊन नाचायला लागली याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. मेंदूत बाबासाहेब व मनगटात छत्रपती शिवाजी महाराज यांना घट्ट पेरा आपल्या खिशात गांधींच्या नोटाआपोआप येतील हे आजच्या जगण्याच सूत्र असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हेच आज खरे असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी मी आज जो या पदावर आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच आहे, असे ते म्हणाले. डॉ.आंबेडकर यांचे आज संविधान नसते तर गोरगरिबांची मुले ही उच्च पदावर दिसली नसती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आजच्या युवा पिढीने त्यांचे विचार डोक्यात घेऊन जीवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा, उच्च शिक्षण घेऊन जीवनात उत्कर्ष करा असे आवाहन केले. प्रा. देविदास साळुंके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सदस्य संजूबाबा गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.