अर्शद आ. शेख
श्रीगोंदा – श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची राजकीय विचारधारा कोणती ? या प्रश्नाचे उत्तर डझनभर राजकीय विचारधारा कोळून पिणारा हा तालुका आहे, असे द्यावे लागेल. डावा, उजवा, मध्यम, अपक्ष, बंडखोर, समाजवादी, शेतकरी संघटना, आरपीआय, असे विविध राजकीय तत्वज्ञान या तालुक्यात रुजले अन् करपले. एका विशिष्ट विचारधारेच्या मागे कायमस्वरूपी हा तालुका कधीच दीर्घकाळ राहिला नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदारपद मुस्लिम लीगच्या मद्दूभाई पटेल यांच्याकडे होते. श्रीगोंद्यात त्यांच्या समर्थनार्थ व विरोधात असे दोन गट पडले होते. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस विचारधाराने येथे बाळसे धरले. विधानसभा सीट आरक्षित झाल्याने आरपीआयने आपला जम बसविला होता. कॉंग्रेसने आरपीआयला सत्तेपर्यंत जाऊ दिले नाही. दरम्यान 1955 ते 1975 च्या दरम्यान लाल निशाण पक्षाने येथे बस्तान बसविले. त्याचे श्रेय जाते ते काष्टीच्या भीमराव पाचपुते यांना. शिवाजीराव नागवडे व शिवराम अण्णा पाचपुते यांनी हा लालबावटा सर्वदूर नेला. हे दोघे कॉंग्रेसवासी झाल्याने लाल बावटा तालुक्यातून नामशेष झाला.
तत्पूर्वी कॉंग्रेसला बंडखोर कॉंग्रेसने 1972 ला विधानसभेत धूळ चारली होती. 1978 ला विधानसभेला नागवडे हे कॉंग्रेस उमेदवार होते. मात्र तेव्हा जनता पक्षाचा उदय झाला होता. मोहनराव गाडे (कोपरगाव) हे बाहेरील उमेदवार असताना जनता पक्षाने दोन नंबरची मते मिळवली होती. 1980 ला तर जनता पक्षाने दोनदा येथून आमदारकी जिंकली ती बबनराव पाचपुते यांच्यामुळे. लोकदलाचे पुढे जनता पक्षात विलीनीकरण झाल्यावर तो जनता दल झाला. त्यानेही येथे 1990 ला विजय मिळविला.
तत्पूर्वीचा जनता पक्ष येथून पूर्ण विसर्जित झाला. 1995 ला वीस वर्षांनी कॉंग्रेस पक्षाने आमदारकी जिंकली, ती देखील पाचपुते यांच्यामुळे. तेव्हा जनता दलाचे अस्तित्व इथून पुसले गेले होते. दरम्यानच्या काळात भाजप-शिवसेने 1990 नंतर येथे पाय रोवायला प्रारंभ केला. सेनेची स्थापना भाऊसाहेब गोरे, सुरेश देशमुख, नंदू ताडे, सतीश कांबळे, जयसिंग घोडके यांनी एकत्र येऊन केली, तर भाजपची मुहूर्तमेढ प्रफुल्ल मेहता, ऍड. मकरंद पत्की, दत्तात्रय हिरनावाळे, डॉ. वसंत झेंडे आदींनी केली.
पुढे घनश्याम शेलार यांनी त्यास खेडोपाड्यात पोहोचवले. भाजप पूर्वी मिरजगाव भागात जनसंघाचा दिवा ऍड. राजाभाऊ झरकर यांनी तेवत ठेवला होता. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस, समाजवादी कॉंग्रेस, बसपा, दूरदर्शी पार्टी यांनी सुद्धा येथून विधानसभेचे नशीब आजमावले. पुढे शेतकरी संघटना, श्रीगोंदा तालुका विकास आघाडी, आरपीआय यांचा राजकारणात उदय व अस्त पाहायला मिळाला. भारिप बहुजन महासंघ, स्वतंत्र भारत पक्ष व राष्ट्रीय समाज पक्षांनी नशीब आजमावले. वरील सर्व पक्षांचा तालुक्यात जसा प्रभाव उमटला, तसा अस्ताला पण गेला. सुमारे पंधरा पक्षांचे तत्वज्ञान या तालुक्याने कोळून प्यायले आहे, असे म्हटले, तर ते चूक ठरू नये. कायमस्वरूपी कोणाच्याही कच्छपी न लागणारा तालुका म्हणून श्रीगोंद्याची इतिहासात नोंद होईल.
संभाजी ब्रिगेड नवा भिडू…
कॉंग्रेस पक्षा इतकाच राष्ट्रवादीने या तालुक्यावर जम बसविला होता. पक्षाने दोनदा आमदारपद मिळवले. एकदा सहयोगी आमदार लाभला. या संघर्षात यंदा संभाजी ब्रिगेडची एन्ट्री झाली आहे. ब्रिगेडची ही पहिली निवडणूक आहे. त्यांच्यासाठी घोडामैदान आता जवळच आहे.