मुंबई – दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा ‘एच3एन2’ विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील 2 रुग्णांचा समावेश आहे. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली असून, अतिशय वेगाने हा विषाणू सर्वत्र पोसरतोय.
या नव्या इन्फल्युएंझा व्हायरसमुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण आहे. तर, दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली होती. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा आपण पाहिलं आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा देशातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
गेल्या 109 दिवसांनंतर देशात करोना विषाणूचे 5000 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी 17 मार्च रोजी एका दिवसात करोना विषाणू संसर्गाच्या 796 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. एकीकडे नवीन विषाणूची लागण झपाट्याने होत असून, आता पुन्हा एकदा करोनाने आपला फैलाव करण्यास सुरुवात केल्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागतील का? अशी चर्चा रंगली आहे.
पण, राज्यात ज्यांना एच3एन2 ची लक्षणं जाणवत असतील किंवा ज्यांना खोकला असेल अशा रुग्णांनी मास्क वापरावे, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसंच, तातडीने उपचार सुरू केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावे. असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे.