यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा : शेत झाले हिरवेगार
चिंबळी- खेड तालुक्याच्या दक्षिण भागात शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात रब्बी हंगामातील पेरणी केलेले ज्वारीचे पीक जोमाने आले आहे, त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. दरम्यान, यंदा परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेले ज्वारीचे पीक वाहून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी केली होती. हे पीक सध्या फुलोऱ्यात आल्याने शेताने जणू हिरवा गालिशा पांघारला असल्याचा भास होत आहे.
खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, वाल, मूग, व इतर पिकांची काढणी करून रब्बी हंगामातील ज्वारीची लागवड केली असून या पिकांच्या खुरपणीची लगबग शेतकऱ्यांची केली आहे. दरम्यान, यंदा परतीच्या पावसाच्या धुमाकुळीमुळे कांदे लागवड उशीरा सुरू झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने औषध फवारणी करण्यासाठी खर्च वाढला असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर पावसामुळे कांदे रोपे सडून गेली असल्याने कांदे लागवड करण्यासाठी रोपे शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.