कृषी मूल्य आयोगाचा प्रस्ताव : केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा
पुणे – साखरेच्या दरात होणाऱ्या सततच्या चढ-उताराचा आर्थिक फटका घरगुती ग्राहकांना बसत असल्याने साखरेच्या विक्री दरासाठी दुहेरी पद्धत सुरू करण्याची योजना राबवण्यात येणार आहे.
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्याने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. इंडियन शुगर मिल्स संघटनेनेही या योजनेचे स्वागत केले आहे. साखरेची विक्री ही घरगुती ग्राहकांपेक्षा ओैद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असते. साधारणत: 31 रुपये प्रति किलो असा साखरेचा दर असेल तर तो सर्वसामान्य ग्राहकांला व औद्योगिक क्षेत्रालाही सारखाच असतो. त्यामुळे साखर कारखान्यांना त्याचा काही फायदा मिळत नाही, पण साखरेच्या विक्रीसाठी दुहेरी पद्धत सुरू केली, तर साखर कारखान्यांना अर्थिक आधार मिळेल. आज साखरेची 60 टक्के विक्री ही औद्योगिक क्षेत्रात होत असते.
दरवर्षी साधारणत: 26 मिलियन मेट्रिक टन साखरेची मागणी या क्षेत्राकडून येत असते. इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्राहक असणाऱ्या या क्षेत्रासाठी जर वेगळा दर ठेवला तर नक्कीच कारखान्यांना फायदा होईल, परिणामी उसाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना ही जास्त पैसे मिळू शकतील, असे आयोगाने म्हटले आहे. केंद्र सरकार याबाबत विचार करत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना कमी दरात साखर उपलब्ध होईल. त्याचबरोबर साखरेचे भाव नियंत्रणात राहतील.