मुंबई – करोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारही हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल करत आहे. मात्र, अजूनही सर्वसामान्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. परिणामी सर्वसामान्य मुंबईकरांना रोज ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. अशातच आता राज्य सरकारने सर्व महिलांना कार्यलयीन वेळेत लोकलने प्रवास करु देण्याची विनंती रेल्वेकडे केली आहे.
उद्या 17 ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती राज्याने केली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिलांना प्रवासाची परवानगी मागितली आहे. मुंबई आणि एमएमआरमधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी क्यूआर कोडची गरज असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एसी लोकल रुळावर
पश्चिम रेल्वेकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दोन आनंदाची बातमी आहे. लॉकडाउनपासून बंद असलेली एसी लोकल आता पुन्हा सुरू होणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या सुरू असलेल्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे आता दिवसाला 506 ऐवजी 700 लोकल चालवणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारने परवानगी दिलेल्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 15 ऑक्टोबरपासून या वाढलेल्या फेऱ्या वेळापत्रकात समाविष्ट केल्या जाणार आहेत.