नवी दिल्ली – शरीरातील ऑक्सिजनची पतळी ही 92 ते 93 टक्क्यांपर्यंत जाणे हे चिंताजनक नही, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील अर्थात एम्समधील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात रणदीप गुलेरिया यांनी शरीरातील ऑक्सिजन पातळीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही 92 किंवा 93 पर्यंत गेल्यानंतर काळजी करण्याचे कारण नाही. उलट घाबरून न जाता शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 पर्यंत खाली आली म्हणजे रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर दाखल करण्याचे हे निदर्शक समजावे, असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी रणदीप गुलेरिया यांनी देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असून, त्याचा जपून वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात आपल्याला गरज पडेल म्हणून काही व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडर आपल्या घरात लपवून ठेवत असल्याचे समोर आले आहे. सध्याच्या महामारीच्या काळात ऑक्सिजन अशा प्रकारे लपवून ठेवणे चुकीचे असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे. तसेच शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी 94 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चिंता करू नये. तुमच्या शरीरात 94 टक्के ऑक्सिजन असेल तर तो पुरेसा आहे. त्यामुळे शरीरात ऑक्सिजन नॉर्मल असूनसुद्धा तो वापरला तर ज्या रुग्णांच्या शरीरात 90 ते 80 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन आहे; त्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही ते म्हणाले.