अकोले – मतदारांनी विकृतीच्या नको, तर विकासाच्या बाजूने उभे रहावे आणि महायुतीचे उमेदवार माजी आमदार वैभव पिचड यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. येथील गुजरी बाजारात पिचड यांची जाहीर सभा झाली. उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला उद्देशून बोलताना त्यांनी पक्षांतर का करावे लागले याचा सविस्तर आढावा घेतला. अध्यक्षस्थानी आप्पा घोडके होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 वे कलम रद्द केले. त्यामुळे जगाच्या बाजारात भारताची मान उंचावली आहे. असे घडत असताना सामान्य माणसांचे प्रश्नही सुटत आहेत. विकासाच्या बाजूने जाण्याचा निर्णय आपण घेतला असून केवळ विरोधाला विरोध नको, याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आता वयाच्या ऐंशीव्या वर्षी आपली ही शेवटची निवडणूक असून यापुढे आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात पडायचे नाही. असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
मोदी सरकारने सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून ओबीसी महामंडळालाही घटनात्मक दर्जा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय रास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विकासाचे पर्व राज्यात व त्याबरोबरच अकोले विधानसभा मतदारसंघात सुरू झालेले आहे. अकोले तालुक्यामध्ये विकासाच्या पर्वाला मतदारांनी साथ द्यावी. लोकसभेला बहुमताने महायुतीचे सरकार जनतेने निवडून दिले. राज्यात तेच सरकार पुन्हा एकदा आणावयाचे असून विकासाची गंगा आणखी वेगाने धावेल. असा आशावाद व्यक्त करून ते म्हणाले की, अकोले तालुक्यात महामार्गाचे काम सुरू झाले आहे.
त्याला नजीकच्या काळात वेग येईल. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अकोले तालुक्यातील रस्ते आणि घरकुले यांचा प्रश्न दोन वर्षात सोडवण्याचे आश्वासन दिले आहे आणि तोलार खिंडीचा प्रश्नही मार्गी लागेल. या सर्व विकास पर्वाच्या पार्श्वभूमीवर कुणीही अपशकून करू नये, असे त्यांनी आवाहन केले. कळसुबाईला वीजप्रवाह नेला. पाणीसाठे निर्मिती, जल वीज निर्मिती मंजुरी व इतर कामांना आपण प्राधान्य दिले. मात्र आपण काहीच केले नाही असा आरोप करणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असा टोला त्यांनी लगावला. नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा ही वजनदार आसामी आहे. देशाचे ते गृहमंत्री आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजता अकोले येथे आयटीआयच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मधुकरराव नवले, शिवाजीराव धुमाळ, वसंतराव मनकर आदींची भाषणे झाली.