मुंबई – कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
करोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव व सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. याच विषयावर मुख्यमंत्र्यांनी उद्या तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावल्याची माहिती आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बंधने घालावीत की नाही यावर उद्यापर्यंत नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्यानंतर त्यांची टेस्टिंग करावे की नाही याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. आज झालेल्या या बैठकीत दक्षिण आफ्रिका तसेच इतर युरोपियन राष्ट्रातून येणाऱ्या विमान प्रवासी आणि त्यामुळे संभाव्य धोक्यावर चर्चा करण्यात आली.
तसेच राज्यातील शाळा या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करणे योग्य ठरेल का यावर चर्चा करण्यात आली आहे. शाळा उघडण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी पुन्हा चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे सध्यातरी “वेट ऍन्ड वॉच’ची भूमीका घ्यावी, असे बैठकीत ठरल्याची प्राथमिक माहिती आहे.