मांजरी : मुंढवा जॅकवेल मधून साडेसतरानळी येथे जुना कालव्यात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे कालव्याच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना व पुढील भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठा फायदा होतो आहे. परंतु ऐन उन्हाळ्यात प्रशासनाकडून कालवा व जॅकवेल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. तेव्हा पाणी सोडणे बंद करून नागरिकांची गैरसोय करू नका अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी दिला आहे.
जुना बेबी कालव्यातील पाणी सुरू ठेवण्याची मागणी करणारे निवेदन सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी दिपक काळे, दिपक गदादे, चंद्रकांत घुले, दिपक घावटे, सुनिल घुले, पोपट टकले, किसन घावटे आदी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहे. मुळा -मुठा नदीच्या पात्रातील पाणी उचलून मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून साडेसतरा नळी येथे बंद पाइपलाइन मधून जुना बेबी कालव्यात सोडण्यात येते. हा कालवा पुढे साडेसतरा नळी, मांजरी बुद्रुक, शेवाळे वाडी, फुरसुंगी गावाच्या हद्दीतून वाहत दौंड तालुक्यातील अनेक गावच्या परिसरातील हाद्दितून वाहत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याचा शेतीसाठी फायदा होतो आहे.
याशिवाय कालव्याच्या आसपासच्या बोअरवेलला पाणीही मिळत असून नागरिकांना वापराचे पाणी म्हणून त्याचा उपयोग होतो आहे. शेतकरी या कालव्याच्या पाण्याची पाणीपट्टीही शासनाला जमा करत आहेत. असे असतानाही खडकवासला पाटबंधारे विभागाकडून कालवा आणि जॅकवेल दुरुस्तीसाठी कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.
ऐन उन्हाळ्यात पाणी सोडणे बंद करून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. विभागाने पाणी आता बंद करू नये. दुरुस्ती करायची झाल्यास ती पावसाळ्यात करावी, असे न करता कालव्यातील पाणी सोडणे बंद केल्यास शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल.
– सुरेश घुले (प्रदेश उपाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
दरम्यान, याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दुरुस्तीसाठी कालव्यात पाणी सोडणे बंद केले होते, परंतु कालव्यात पाणी सोडण्याची मागणी काही शेतकर्यांनी केली आहे. त्यानुसार आज पुन्हा कालव्यात पाणी सोडण्यास सांगितले आहे.