शिर्डी -शिर्डी साईबाबांचे मंदिर हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक असून याठिकाणी हिंदू-मुस्लिम एकतेच प्रतीक म्हणून आजही द्वारकामाई मंदिरावर फडकणारा भगवा आणि हिरवा झेंडा सर्वांसाठी अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे आम्ही रात्रीचा व सकाळचा अजान लाऊडस्पीकरवर म्हणणार नाही पण साई मंदिरात होणाऱ्या पहाटेच्या काकड आरतीवेळी लाऊडस्पीकर सुरू ठेवावे, अशी मागणी शिर्डीतील मुस्लिम बांधवांनी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.
साईबाबांच्या मंदिरातील काकड आरती व मशिदीमधील अजान बुधवारी विना भोंग्याची झाली. साईबाबांची पहाटेची काकड आरती विना भोंग्याची झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिर्डीमधील मुस्लिम बांधवांच्या जामा मशीद ट्रस्टच्या वतीने शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
शिर्डीत आणि पंचक्रोशीत अनेकांची दिवसाची सुरुवात भूपाळी, काकड आरती आणि अजानच्या शांत आवाजाने होत होती. एकप्रकारे पूर्वी वेळेवर उठण्यासाठी जसा घड्याळाच्या अर्लामचा उपयोग होत होता, त्याचप्रमाणे पहाटेच्या भक्तिमय वातावरणात अजान, भूपाळी आणि काकड आरतीचा आवाज हा जणू जीवनाचा एक भाग बनला होता.
सध्या भोंग्याचा आवाज आणि त्यावरून तापलेल्या वातावरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. शिर्डीचे साईबाबा हिंदू होते का मुस्लिम यावर अनेकांनी रिसर्च केले असले तरी आजपावेतो साईबाबांची जात, धर्म कुणालाही माहीत नाही. तसा उल्लेखही कुठे सापडत नाही. “अल्लाह मालिक, श्रध्दा सबुरी आणि सबका मलिक एक’ हा संदेश देणाऱ्या साईंच्या नगरीतील हिंदू-मुस्लिम समाजातील एकोपा हा निश्चितच अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
साईंची गुरुवारी निघणारी पालखी आणि त्यामध्ये वाद्य वाजवणारे मुस्लिम बांधव हे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. याच पालखीत ताशा वाजविणारे रहीम चाचा आज वयाच्या 104 वर्षीही आपली निरंतर सेवा बाबांच्या पालखीत देत आहे. साई समाधी शताब्दी उत्सवात परमपूज्य गंगागिरी महाराज सप्ताहात एक दिवसाची प्रसादाची पंगत मुस्लिम बांधवांच्या वतीने होती. हजारो मुस्लिम बांधवांनी याच सप्ताह कार्यक्रमात केलेली सेवा राज्यातील सर्वात आदर्श घेणारी ठरली. त्यांचे अभिनंदन व कौतुक सराला बेटचे महंत रामगिरी महाराजांनी केले होते. शिर्डीत येणाऱ्या पायी चालत येणाऱ्या पालख्यामधील भाविकांची सोय मुस्लिम बांधव दरवर्षी करतात.
समाजाकडून जपली जाते परंपरा
विजयादशमी (दसरा) उत्सवाच्या दिवशी शिर्डीतील मुस्लिम बांधव एकत्र येऊन द्वारकामाई मंदिरात स्वतःच्या हाताने चंदन लावतात.संदलच्या मिरवणुकीत हिंदू बांधव डोक्यावर ताबूत घेऊन मिरवणुकीत सहभागी होण्याची परंपरा आजही जोपासली जाते.