कोलकाता – आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा आणि अन्य भाजप नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यात दगडफेकीचा काल प्रकार घडला होता.
त्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचा अहवाल राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्या अनुषंगाने आज पत्रकारांशी बोलताना राज्यपालांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की राज्यात लोकशाहींची हत्या सुरू असून त्या अनुषंगाने मी सारा वृत्तांत केंद्र सरकारला कळवला आहे असे त्यांनी नमूद केले. काल झालेला सारा प्रकार दुर्देवी होता असेही त्यांनी नमूद केले.
अमित शहा यांच्या आगमनानंतर आता नढ्ढा, फढ्ढा, चढ्ढा, बढ्ढा नावाचे नेते या राज्यात येऊन नौटंकी करीत आहेत. त्यांना दुसरे काहीही काम नाही असे विधान ममतांनी केले होते त्यावरही राज्यपालांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना वरील इशारा दिला.
त्यांच्या या वक्तव्याची मी गंभीर दखल घेतली आहे. एका जबाबदार मुख्यमंत्र्यांनी अशी अभिरूचीहीन शेरेबाजी करणे राजकीय सभ्यतेच्या चौकटीत बसत नाहीत असेही राज्यपालांनी नमूद केले. हे शब्द मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले.